“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
चार वेळा निवेदने देऊनही प्रशासनाला जाग नाही; पिंपळा (बु.) येथील शेतकऱ्याचा गंभीर आरोप
धाराशिव Lokvichar – लोकविचार
महसूल विभागाच्या कथित गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावरून तब्बल २८ गुंठे जमीन कमी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील शेतकरी गुलाब मेहबूब शेख यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा निवेदने देऊनही न्याय मिळाला नसल्याने कुटुंबासह आज ७ जुलै २०२६ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेतकरी गुलाब शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गट क्रमांक १४अ आणि १४ब मधून प्रत्यक्षात कोणताही कालवा गेलेला नसतानाही सन २०१३ मधील फेरफार क्रमांक १०८८ च्या आधारे त्यांच्या ७/१२ उताऱ्यावरून २८ गुंठे क्षेत्र कमी करण्यात आले. मात्र, या संपादनाबाबत त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातून आजपर्यंत कालवाही गेलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याप्रकरणी त्यांनी १७ ऑक्टोबर २०२५, ११ डिसेंबर २०२५, १९ जानेवारी २०२६ आणि १२ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी अर्ज दिले. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शेख यांनी आपल्या निवेदनात महसूल विभागाच्या अनेक त्रुटींकडे बोट ठेवले आहे. फेरफार क्रमांक १०८८ मध्ये गट क्रमांक १४अ आणि १४ब असा स्पष्ट उल्लेख नसून केवळ गट क्रमांक १४ असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपादनाची नोंद एका व्यक्तीच्या नावावरच करण्यात आली असून इतर हक्कधारकांच्या नावावरील क्षेत्राचा विचारच करण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याप्रकरणी सरकारी मोजणी करून प्रत्यक्षात कालवा नसल्याचे सिद्ध झाल्यास ७/१२ वरील चुकीची नोंद तात्काळ दुरुस्त करावी आणि कमी करण्यात आलेले २८ गुंठे क्षेत्र पूर्ववत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी महसूल विभागाचे उंबरठे झिजवूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर?” असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


