एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर पोलिसांचा छापा; ५० लाखांहून अधिक साहित्य जप्त
बार्शी लोकविचार
तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या कला केंद्रांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत “लवंगी मिरची” कला केंद्रावर मध्यरात्री छापा टाकून तब्बल ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिस प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार प्रभावी पेट्रोलिंग, नाकाबंदी आणि संशयित ठिकाणांची तपासणी सुरू असताना दिनांक २४ मे २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर रोडवरील “लवंगी मिरची” कला केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी कला केंद्रात नृत्य सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत नृत्यांगना, ग्राहक, चालक व मालक अशा एकूण ७२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.या धाडीत रोख रक्कम, मोबाईल फोन, विविध साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाईसोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान, बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या काही कला केंद्रांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
व्यसन, आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक वादामुळे अनेकांनी आपले जीव गमावल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अशा अवैध कला केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


