सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा
अवैध कलाकेंद्रांवर प्रशासनाची मोठी कारवाईवारंवार पाठपुरावा, प्रश्नांचा भडिमार आणि सातत्यपूर्ण वृत्तप्रसारणाचा परिणाम ६ पैकी सर्व कलाकेंद्रांवर पडदा
धाराशिव | सर्वसामान्य लोकविचारधाराशिव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध कलाकेंद्रांच्या प्रश्नावर अखेर मोठी आणि ऐतिहासिक कारवाई होत संपूर्ण जिल्हा “कला केंद्रमुक्त” झाल्याची नोंद झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य लोकविचार ने घेतलेली आक्रमक आणि सातत्यपूर्ण भूमिका निर्णायक ठरली असून, वृत्तपत्राच्या पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली, अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भावना व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील आळणी पाट, येडशी, चोराखळी,वाशी,कळंब, परिसरामध्ये सुरू असलेल्या या अवैध कलाकेंद्रांमुळे सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर पातळीवर गंभीर परिणाम होत होते. विशेषतः या केंद्रांमुळे अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या, तर शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र, या प्रश्नाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते.याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकविचार ने या विषयाला प्राधान्य देत सातत्याने वृत्तप्रसारण सुरू ठेवले. केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरते न थांबता पालकमंत्री प्रताप सरनाई, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासमोर पत्रकार परिषदेत थेट प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जबाबदार धरण्याचे काम करण्यात आले. “अवैध कलाकेंद्रांवर कारवाई कधी होणार?” हा मुद्दा सातत्याने लावून धरल्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत गेला.या दबावाचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील ६ पैकी ५ कलाकेंद्रांवर आधीच कारवाई करण्यात आली. तुळजाई, गौरी, साई, पिंजरा आणि कालिका या कलाकेंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून ती केंद्रे सील करण्यात आली. मात्र, एकमेव उरलेले महाकाली कला केंद्र न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत सुरू ठेवण्यात आले होते. या संदर्भातही लोकविचार ने सातत्याने प्रश्न उपस्थित करत “न्यायप्रविष्ट प्रकरण म्हणजे पूर्ण मोकळीक का?” असा थेट सवाल उपस्थित केला.दरम्यान, संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काही काळासाठी कारवाई थांबलेली दिसून आली. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रशासनाला कारवाईचा मार्ग मोकळा झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आदेश देत महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून ते सील करण्याचे निर्देश दिले. या निर्णयानंतर जिल्ह्यातील शेवटचे उरलेले कलाकेंद्रही बंद पडले आणि धाराशिव जिल्हा पूर्णपणे “कला केंद्रमुक्त” झाला.या संपूर्ण कारवाईनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्वसामान्य लोकविचार च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. “जागृत पत्रकारितेमुळेच हे शक्य झाले,” अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी माध्यमाचे आभार मानले आहेत.दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची अवैध कलाकेंद्रे पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरत आहे.एकूणच, धाराशिव जिल्ह्यातील ही कारवाई ही केवळ प्रशासनाची कृती नसून जागरूक पत्रकारिता, जनतेचा दबाव आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यशस्वी उदाहरण ठरली आहे. सर्वसामान्य लोकविचार इम्पॅक्ट म्हणून या घटनेकडे पाहिले जात असून, भविष्यातही अशाच प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786 यांना

