महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाईलोकविचार न्यूजच्या पाठपुराव्याला यश उच्च न्यायालयाचा दिलासा उठताच जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णायक आदेशधाराशिव | लोकविचार न्यूजधाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील वादग्रस्त महाकाली कला केंद्रावर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलत त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असून केंद्र 24 तासांच्या आत सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ही अंमलबजावणी पूर्ण केली.या प्रकरणात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तक्रारी, चौकश्या आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर निर्णायक टप्पा गाठण्यात आला. महाकाली कला केंद्राचे चालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सुनावणीदरम्यान मागे घेतल्याने प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने यापूर्वी दिलेला अंतरिम दिलासाही रद्द करण्यात आला.दरम्यान, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या प्रकरणात ठोस भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले होते. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्र सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. महसूल व पोलीस विभागाने संयुक्त अहवाल देत केंद्रातील गंभीर अनियमितता अधोरेखित केल्या होत्या.चौकशीत महाकाली कला केंद्रात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. इमारतीसाठी आवश्यक बांधकाम परवानगी नसणे, प्रवेश-निर्गमनासाठी स्वतंत्र मार्गांचा अभाव, रंगमंच व प्रेक्षकांसाठी मूलभूत सुविधा नसणे अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. याशिवाय 10 वातानुकूलित खोल्यांमध्ये नृत्य सादरीकरण होत असल्याचे समोर आले. पारंपरिक कला सादरीकरणाऐवजी साउंड सिस्टीमवर कार्यक्रम घेतले जात असल्याचेही आढळले.तसेच तिकीट व्यवस्थेत पारदर्शकतेचा अभाव, जीएसटी नोंदी नसणे, कलाकारांची अधिकृत माहिती पोलिसांकडे न देणे, तसेच परिसरालगत बियर बार व लॉजिंग सुरू असल्याच्या बाबी अहवालात नमूद करण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव व संबंधित कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.या सर्व बाबींचा गंभीर विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत परवाना कायमस्वरूपी रद्द करत तात्काळ सील करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार कळंब तहसील कार्यालय आणि येरमाळा पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत 24 तासांत केंद्र सील केले.या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. मात्र, हे केंद्र पुन्हा अनधिकृतरित्या सुरू होऊ नये यासाठी प्रशासनाने सतत देखरेख ठेवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध कला केंद्रांवर प्रशासनाची कडक नजर राहणार असल्याचे संकेत मिळत असून भविष्यात अशा बेकायदेशीर उपक्रमांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
लोकविचार न्यूज – सत्य शोधून लिहिण्याची ताकदसंपादक : अमजद सय्यद | संपर्क 083900 88786

