धाराशिव-पुणे व्यवहार, नोंदणी मात्र परंडा कॅम्पमध्ये ?पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हस्तक्षेप करून सर्व नोंदींची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्याची मागणी
उप प्रादेशिक कार्यालय असताना तालुका कॅम्पचा वापर नेमका कुणासाठी? दलाल-अधिकारी संगनमताच्या चौकशीची मागणी!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील बहुचर्चित चारचाकी वाहन हस्तांतरण आणि बनावट नोंदणी प्रकरणात आता नवा गंभीर प्रश्न समोर आला असून, वाहन विक्रेता धाराशिव शहरातील आणि कथित खरेदीदार पुणे येथील असताना वाहन खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी परंडा येथील आरटीओ कॅम्पमध्ये नेमकी कशासाठी करण्यात आली, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे. जिल्हा मुख्यालय धाराशिव येथे अधिकृत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अस्तित्वात असताना, अशा संवेदनशील व्यवहारासाठी परंडा कॅम्पचा वापर करण्यात आल्याने दलाल, एजंट आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.तक्रारदाराच्या मते, जिल्ह्याच्या मुख्यालयातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमानुसार न बसणारी कागदपत्रे किंवा बेकायदेशीर प्रक्रिया शक्य नसल्यानेच व्यवहार जाणीवपूर्वक तालुका स्तरावरील कॅम्पमध्ये वळवण्यात आला असावा. कारण धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके हे नियमबद्ध व पारदर्शक कारभारासाठी ओळखले जातात. त्यामुळे जिल्हा कार्यालयात न होणारे व्यवहार तालुका स्तरावर होत असलेल्या कॅम्पमध्ये नेऊन पूर्ण करण्यात आले काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.मुळात ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीस्कर सेवा मिळावी या उद्देशाने तालुकास्तरावर आरटीओ कॅम्पचे आयोजन केले जाते. वाहन नोंदणी, परवाने आणि इतर कामे स्थानिक स्तरावर व्हावीत हा शासनाचा हेतू असला, तरी या सुविधेचा वापर काही दलाल आणि संशयित टोळ्यांकडून गैरप्रकारांसाठी होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः धाराशिव शहरातील काही एजंट विविध तालुक्यांतील कॅम्पचा वापर करून संशयास्पद व्यवहार पूर्ण करत असल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणात वाहन मालक धाराशिवचा, खरेदीदार पुण्याचा, कर्ज व्यवहार वेगळ्या स्तरावर आणि नोंदणी मात्र परंडा येथे — या सर्व साखळीमुळे व्यवहाराची पारदर्शकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वाहन खरेदी-विक्री प्रक्रियेत जिल्हा कार्यालय टाळण्यामागे नेमका उद्देश काय होता? संबंधित कागदपत्रे तपासली गेली होती का? ओळख पडताळणी कोठे झाली? व्यवहारासाठी आवश्यक मूळ उपस्थिती तपासली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.
या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विवेक डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, परंडा येथील शिबिरात झालेल्या वाहन खरेदी-विक्री प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित दोन व्यक्तींची नावे नमूद करून कारवाईची मागणी करण्यात आली असून, दोषींवर पोलीस योग्य ती कारवाई करतील. तसेच आरटीओ कार्यालयातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यानंतर प्रकरणाचा केंद्रबिंदू आता आनंदनगर पोलीस ठाण्याकडे वळला आहे. पोलिस तपासात नेमके कोणते पुरावे समोर येतात, दलाल-अधिकारी संगनमत सिद्ध होते का, तसेच कॅम्पमधील व्यवहारांची साखळी उघड होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तालुका स्तरावर होत असलेल्या कॅम्पमधील संबंधित नोंदी, वाहन हस्तांतरण, परवाने आणि संशयास्पद व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून होत आहे.जिल्ह्यातील आरटीओ कॅम्प सुविधा ही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी की दलालांच्या फायद्यासाठी, हा मूलभूत प्रश्न आता ऐरणीवर आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास आणि आनंदनगर पोलीस स्टेशनची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786.
(भाग ३ मध्ये – आनंदनगर पोलीस स्टेशनची भूमिका, तक्रारीवरील कारवाई आणि पुढील तपासाचा संपूर्ण आढावा.)


