गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक; भूम-परंडा-वाशी मतदारसंघात अंतर्गत गटबाजी विसरून शिवसेना संघटन अधिक मजबूत करा – आ.तानाजीराव सावंत
माजी मंत्री आ. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक; विकास, जनसेवा आणि संघटन मजबुतीवर भर
भूम | लोकविचार
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता संघटन अधिक मजबूत करून मतदारसंघात घराघरात शिवसेना पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.बैठकीत मार्गदर्शन करताना आ. तानाजीराव सावंत यांनी “गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” हा विजय मंत्र देत संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. निवडणुकांतील विजय ही केवळ सुरुवात असून आता खरी जबाबदारी वाढल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक गावात शिवसेनेचा भगवा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाचा झंझावात सुरू असून, त्याच धर्तीवर भूम-परंडा-वाशी मतदारसंघातही विकासकामांना अधिक वेग देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, गतिमान प्रशासन आणि जनकल्याणकारी निर्णयांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक आक्रमक व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना संबोधित करताना आ. सावंत यांनी सत्तेचा वापर केवळ सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच व्हावा, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ग्रामीण भागातील विकासकामे, जनसंपर्क आणि स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण यावर भर देत त्यांनी अंतर्गत मतभेद, हेवेदावे विसरून एकदिलाने जनसेवेसाठी कार्यरत राहण्याचे निर्देश दिले.जनतेने शिवसेनेवर दाखवलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी संघटनात्मक बांधणी, महिला आघाडी व युवासेनेची सक्रियता, तसेच तळागाळातील प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची भूमिका बैठकीत अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक गावात सर्वसामान्य नागरिकाला न्याय आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिवसेना अधिक आक्रमकपणे कार्य करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामीण भागातील प्रगतीला चालना देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास विकासाचा नवा अध्याय यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास आ. डॉ. तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे आगामी काळात भूम-परंडा-वाशी मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक आणि विकासात्मक कामांना नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



