तेरखेडा फटाका उद्योगाला नवी उभारी; सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा – आ .प्रा. डॉ. तानाजीराव सावंत
उद्योजकांच्या सुरक्षेसाठी २४ तास अग्निशमन दलाची गाडी सज्ज ठेवण्याची घोषणा; उद्योगवाढीसोबत कामगार सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
वाशी लोकविचार
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तेरखेडा येथील फटाका उद्योग अधिक सक्षमपणे सुरू राहावा तसेच उद्योजकांसमोरील विविध अडचणी दूर करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने सकारात्मक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्योगाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही प्रा. सावंत यांनी यावेळी दिली.
बैठकीत बोलताना प्रा. सावंत म्हणाले की, तेरखेडा येथील फटाका उद्योगाची ओळख महाराष्ट्रासह देशभरात अधिक भक्कमपणे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. ग्रामीण भागातील हजारो युवकांना या उद्योगातून रोजगार उपलब्ध होत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योजकांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देत तेरखेड्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उद्योगवाढीसोबतच कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. फटाका कारखान्यांमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना, शासकीय नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित कार्यपद्धती अवलंबणे अत्यावश्यक असल्याचे प्रा. सावंत यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत प्रा. सावंत यांनी तेरखेडा येथील फटाका उद्योगांच्या सुरक्षेसाठी भैरवनाथ उद्योग समूह, साखर कारखाना (इंदापूर-वाशी) यांच्या वतीने २४ तास अग्निशमन दलाची गाडी सज्ज ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे उद्योजक आणि कामगारांच्या सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
“व्यवसायाची प्रगती आणि कामगारांची सुरक्षा या दोन्ही बाबी समान महत्त्वाच्या आहेत. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून जबाबदारीने उद्योग चालविल्यास तेरखेड्याचा फटाका उद्योग देशभरात आदर्श ठरेल,” असा विश्वासही प्रा. सावंत यांनी व्यक्त केला.
या बैठकीस विकासरत्न प्रा. डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, शिवसेना धाराशिव जिल्हा परिषद गटनेते संदेश विकी चव्हाण, पंचायत समिती सदस्य बालाजी घोलप, तसेच तेरखेडा परिसरातील फटाका उद्योजक, शिवसेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

