प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर
रस्ते, गतिरोधक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नगराध्यक्ष नेहा काकडे यांचे लवकर कामे सुरू करण्याचे आश्वासन
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका सौ. रुपालीताई सुनील आंबेकर यांनी आज नगराध्यक्ष सौ नेहा काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात त्यांनी प्रभागातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय (खराब) झाल्याचे नमूद केले आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याशिवाय प्रभाग क्रमांक ९ मधील विविध रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणीही करण्यात आली. परिसरात अनेक कोचिंग क्लासेस असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने गतिरोधक उभारून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नगरसेविका आंबेकर यांनी केली.
यावेळी नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी निवेदनाची दखल घेत प्रभाग क्रमांक ९ मधील मंजूर रस्त्यांची कामे तसेच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक खलिफा कुरेशी, पंकज भोसले, अयाज उर्फ बबलू शेख, इस्माईल शेख, विशाल शिंगाडे, सुनील आंबेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

