दस्तापूर येथील भूमिहीन लाभार्थ्यांना मालकी हक्क द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
धाराशिव Lokvichar – लोकविचार
लोहारा तालुक्यातील मौजे दस्तापूर येथील गट क्रमांक ९८ मधील २५ आर जागेवरील भूमिहीन लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरांचे मालकी हक्क प्रमाणपत्र (कबाला) तात्काळ देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ऑल इंडिया फकिरा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास दिनांक ९ जुलै रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजे दस्तापूर येथील गट क्रमांक ९८ मधील २५ आर जमीन सन १९६५ मध्ये भूमिहीनांसाठी शासनाने संपादित केली होती. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यात आली. मात्र आजतागायत या लाभार्थ्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र (कबाला) देण्यात आलेले नाही.या प्रकरणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यात आवश्यक सुधारणा करण्यात आली असून जमीन कमी करण्यात आली आहे.
तसेच शासकीय मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात आल्या असून अधिकृत मोजणी नकाशाही उपलब्ध झाला आहे. तरीही मोजणी नकाशानुसार ग्रामपंचायतीच्या अभिलेखात जमीन नोंदविण्यात आलेली नसल्याने लाभार्थ्यांना मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे गट क्रमांक ९८ मधील २५ आर जागेची ग्रामपंचायतीच्या नोंदीत तात्काळ नोंद करून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरांचे मालकी हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांच्या नेतृत्वाखाली नागीन थोरात (मराठवाडा अध्यक्ष), पार्वती झुंजारे, अलकाबाई लोंढे आणि शिवाबाई झुंजारे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि सामूहिक आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


