धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव लोकविचार
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑनलाईन उपस्थित राहून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी हवामान बदल, एलनिनोचा प्रभाव, कमी पर्जन्यमानाची शक्यता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेता खरीप हंगामाची तयारी अधिक सक्षमपणे होण्याची गरज असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी ४ लाख ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी डीएपी खताचा पुरेसा पुरवठा आवश्यक असून आवश्यक १९,२०० मे.टन खताच्या तुलनेत केवळ १०,०८२ मे.टन खत उपलब्ध झाल्याने उर्वरित खताचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच एलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे फळबागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद करत महाडीबीटी योजनेंतर्गत ५५० शेततळ्यांच्या खोदकाम व अस्तरीकरणासाठी ₹८.२५ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही प्रताप सरनाईक यांनी बैठकीत केली.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


