तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास
धाराशिव लोकविचार
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तब्बल ९७८ कोटी रुपयांची विमा भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विमा कंपनीने सादर केलेली तांत्रिक उत्पादन आकडेवारी वस्तुनिष्ठ नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.खरीप २०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४.९६ लाख शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी पिकांचा विमा उतरवला होता. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात २२० वेळा अतिवृष्टीची नोंद झाली असून ९२ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे.सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेल्या ५०४ पीक कापणी प्रयोगांपैकी ३६८ प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. मात्र जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समितीने बहुतेक आक्षेप फेटाळून विमा वितरणाचे आदेश दिले आहेत. तरीही विमा कंपनीने केंद्रीय समितीकडे अपील करून नुकसानभरपाईला विलंब लावल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
प्रत्यक्ष उत्पादन ३ ते ४ क्विंटल प्रति हेक्टर असताना तांत्रिक उत्पादन १० ते १२ क्विंटल दाखवून नुकसानीचे प्रमाण कमी दाखवण्यात आल्याने १४ महसूल मंडळे विमा भरपाईतून वगळली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.पीक कापणी प्रयोगाच्या आधारे हेक्टरी ३० ते ३५ हजार रुपये प्रमाणे एकूण ९७८ कोटी रुपयांची विमा भरपाई तातडीने वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


