आरटीओ-दलाल साठगाठीतून वाहन हडप? बनावट कागदपत्रे, बेकायदेशीर नोंदणी; तक्रारदाराचा संताप — “न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन
”पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालावे; परिवहन विभागातील गैरप्रकारांवर सखोल चौकशीची मागणी
धाराशिव | लोकविचार
धाराशिवमध्ये चारचाकी वाहन फसवणुकीतून परस्पर दुसऱ्याच्या नावावर नोंदणी करून हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी , कर्मचारी, बँक अधिकारी व दलाल यांची साखळी सक्रिय असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करून वाहनाचा ताबा तात्काळ परत मिळावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.तक्रारदार नबी महमदइसाक शेख (रा. तांबरी विभाग, नगर परिषद शाळा क्र. २१ समोर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सन २०१९ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनुदान व कॅनरा बँकेकडून सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज तसेच स्वतःची रक्कम मिळून ‘इनोव्हा क्रिस्टा’ (एमएच-२५ एजे-२२६६) हे वाहन खरेदी केले होते. ‘गाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या व्यवसायासाठी घेतलेले हे वाहन त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांनी नियमितपणे कर्जाचे हप्ते भरले असून, जिल्हा उद्योग केंद्राचेही कर्ज त्यांनी प्रामाणिकपणे फेडले असल्याचे सांगितले.दरम्यान, सन २०२१ पासून ओळखीत आलेल्या चंदन यादव याने हे वाहन खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार १४ सप्टेंबर २०२४ रोजी स्टॅम्प पेपरवर करार करून वाहन तात्पुरते वापरासाठी देण्यात आले. करारातील अटींनुसार, सलग तीन हप्ते न भरल्यास व्यवहार रद्द होणार होता. सुरुवातीला जानेवारी २०२५ पर्यंत काही हप्ते भरल्यानंतर आरोपीने हप्ते थकवले. परिणामी, मे २०२५ मध्ये तक्रारदाराने वाहन परत घेतले व व्यवहार रद्द झाल्याचे दोघांनी मान्य केले.मात्र, यानंतरच कथित कटकारस्थानाला सुरुवात झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. चंदन यादव व सिताराम शेंडगे यांनी संगनमत करून ३ डिसेंबर २०२४ रोजी बनावट करार दाखवून वाहन स्वतःचे असल्याचा दावा केला. पुढे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी एम.के. फंक्शन हॉल येथे तक्रारदार गाडी घेऊन गेले असताना, आरोपी शेंडगे काही साथीदारांसह तेथे पोहोचला व दमदाटी करत गाडी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.प्रकरण इतक्यावरच न थांबता, कर्ज प्रलंबित असतानाही बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून सुमारे ११ लाख ४८ हजार रुपये जमा करून घेतल्याचा आणि तक्रारदाराच्या अनुपस्थितीतच कर्ज खात्याची एनओसी काढण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या व्यवहाराबाबत कोणतीही माहिती, एसएमएस किंवा अधिकृत कळवणी तक्रारदाराला देण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातही गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पुढे आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या परवानगीशिवाय व अनुपस्थितीतच वाहनाच्या आरसी बुकवरील पत्ता व मोबाईल क्रमांक बदलण्यात आला. त्यानंतर डुप्लिकेट आरसी बुक काढून ते आरोपीकडे सुपूर्द करण्यात आले आणि त्याच आधारे वाहन आरोपीच्या नावावर बेकायदेशीररीत्या नोंदणी करण्यात आली. या प्रक्रियेत आरटीओ कार्यालयातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दलालांनी आर्थिक व्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.“माझ्या नावावर असलेले वाहन, माझ्या अनुपस्थितीत व माझ्या परवानगीशिवाय दुसऱ्याच्या नावावर करण्यात आले. हे केवळ फसवणूक नसून, संगनमताने रचलेला मोठा कट आहे,” असा आरोप तक्रारदाराने केला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला असून, मानसिक धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.विशेष म्हणजे, तक्रारदाराने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता ती नोंदवून घेतली नसल्यामुळे त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत, आरोपी सिताराम शेंडगे, चंदन यादव, निलेश मिसाळ (तत्कालीन बँक व्यवस्थापक), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (यामध्ये सामील असलेले) रामेश्वर मसे (आरटीओ एजंट) व इतर संबंधितांवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(३)सह विविध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे धाराशिव जिल्ह्यात आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. बनावट कागदपत्रे, पत्त्यात फेरफार, डुप्लिकेट आरसी बुक काढणे आणि परस्पर वाहन नोंदणी अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.तक्रारदाराने या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत, दोषींवर कठोर कारवाई व वाहनाचा ताबा तात्काळ परत मिळावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळातच जर परिवहन विभागाच्या कार्यालयात असे गंभीर प्रकार घडत असतील, तर याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.आता या गंभीर आरोपांवर पोलीस प्रशासन व परिवहन विभाग काय भूमिका घेतात आणि संबंधितांवर कधी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद | 8390088786


