भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच घेताना दोघे रंगेहात; बार्शीत एसीबीची धडक कारवाई, धाराशिवमध्ये मात्र मजुरांची ‘दलालांकडून’ उघड लूट सुरूच?
बार्शी/माढा लोकविचार
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गरजू कामगारांकडून लाच उकळणाऱ्या दलालांवर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा बडगा उगारला आहे. बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत मिळणाऱ्या गृहउपयोगी भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना दोन खाजगी इसमांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्याने बार्शी-माढा परिसरात खळबळ उडाली आहे.
मात्र, याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारे अनेक दलाल मजुरांची राजरोस लूट करत असल्याचा गंभीर आरोप होत असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना कामगारांमधून व्यक्त होत आहे.या प्रकरणातील आरोपी विनोद विजय गाडेकर (वय ३७) व दिनेश मनोहर वाघमारे (वय २३), दोघेही भांडी वाटप केंद्र, उपळाई (बु.), ता. माढा येथे ऑपरेटर म्हणून काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम कामगार असून त्यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भांडीसंच मिळवण्यासाठी दि. २७ मार्च २०२६ रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र लाभ देण्यासाठी आरोपींकडून सुरुवातीला तब्बल १,२०० रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर ५०० रुपयांवर व्यवहार ठरल्यानंतर संबंधित कामगाराने दि. १६ एप्रिल रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.यानंतर एसीबीने शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले.
त्यानुसार सापळा रचण्यात आला. महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कार्यालयात आरोपी विनोद गाडेकर याने तक्रारदारास लाचेची रक्कम दिनेश वाघमारे याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ५०० रुपये देताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.या प्रकरणी Prevention of Corruption Act, 1988 अंतर्गत कलम ७(अ) व १२ नुसार माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार व एसीबी सोलापूरच्या पथकाने केली.
दरम्यान, या कारवाईनंतर धाराशिव जिल्ह्यातील कामगारांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी दलालांनि मजुरांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
काही ठिकाणी बनावट कागदपत्रे, अपात्र लाभार्थी आणि कमिशनच्या माध्यमातून मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा असून, अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कामगार यांच्या कडून करण्यात येत आहे.बार्शीतील एसीबीच्या कारवाईमुळे आता धाराशिवमधील अशा दलालांवरही कारवाई होणार का? शासनाच्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या आणि गरीब मजुरांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांवर प्रशासन कठोर पावले उचलणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


