तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम बनले घाणीचे साम्राज्य..बाथरूमची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू त्रस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उघड्यावर लघुशंकेचे प्रमाण वाढले
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम हे आज घाणीचे साम्राज्य बनल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे एकमेव आणि महत्त्वाचे क्रीडा मैदान म्हणून ओळख असलेल्या या स्टेडियममध्ये दररोज सकाळ-संध्याकाळ शेकडो महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले व्यायाम, धावणे आणि विरंगुळ्यासाठी येत असतात. मात्र येथे मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे स्टेडियम परिसरात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये उभारण्यात आली असली तरी त्या ठिकाणी पाण्याची कोणतीही व्यवस्था नसून प्रचंड अस्वच्छता पसरलेली आहे. दुर्गंधी इतकी वाढली आहे की नागरिक त्या शौचालयांचा वापर करण्यास धजावत नाहीत. परिणामी अनेक पुरुष स्टेडियमच्या कोपऱ्यांमध्ये उघड्यावर लघुशंका करत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.सायंकाळच्या वेळेस महिला मोठ्या संख्येने चालण्यासाठी व व्यायामासाठी येतात. त्याचप्रमाणे अनेक पालक आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन येतात. मात्र प्रत्येक कोपऱ्यात घाण आणि दुर्गंधी पसरल्याने महिलांना नाक दाबून या परिसरातून जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयही याच परिसरात आहे. कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या शौचालयांची दयनीय अवस्था पाहता प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक दररोज येथे सरावासाठी येत होते. तसेच या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा, स्केटिंग, बॅडमिंटन, टेनिस स्पर्धा, खुली व्यायाम शाळा, कराटे सराव सुरू असून याशिवाय अनेक ज्येष्ठ नागरिक आरोग्याच्या दृष्टीने सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि बाथरूमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या ठिकाणी असलेल्या घाणीमुळे खेळाडूंनी आपल्या सरावासाठी खाजगी अकादमीचे मैदाने, हातलाई देवी मंदिर परिसर, लेणी रोड वरील डोंगराळ मैदान, इंजिनिअर कॉलेज शेजारील खाजगी मैदाने निवडली आहेत त्यामुळे त्यांना शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक बोजाही सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना जिल्ह्याच्या मुख्य स्टेडियमची अशी दुरवस्था का झाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणीच जर ही परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागातील क्रीडा संकुलांची अवस्था काय असेल, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून स्टेडियम परिसरातील शौचालये स्वच्छ करावीत, नियमित पाण्याची व्यवस्था करावी तसेच महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक आणि स्वच्छ बाथरूम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर कारवाई करून स्टेडियम परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
“स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या पुढाऱ्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,” अशी भावना व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद — 083900 88786


