शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
धाराशिव लोकविचार
कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी, चुकीचे संच मान्यता धोरण, आणि बीएलओ कामाचा सक्तीचा त्रास या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिक्षक ल शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने उतरून या धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिक्षण संचालक पुणे यांच्या दि.१४/०५/२०२६ च्या पत्रांनो हे महाराष्ट्र राज्यात सुरू केलेली विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख पदोन्नती मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी व ते पत्र अधिक्रमित करावे. तामिळनाडू उत्तर प्रदेश तेलंगणा सरकारच्या धर्तीवर सन २०१० पूर्वी लागलेल्या सर्व व सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे वय व मानसिक आरोग्य व शारीरिक व्याधी पाहता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या नियमांमध्ये शिथिलता व बदल करण्यात यावेत. तसेच कार्यरत सेवा जेष्ठ शिक्षकांना टीईटी पास होण्यासाठी सरसकट ६०/१५० (४० टक्के) गुणांची अट लावण्यात यावी किंवा कार्यरत शिक्षक यांच्यासाठी शिकवत असलेल्या इयत्तांच्या अभ्यासक्रमानुसार स्वतंत्र टीईटी समक्ष परीक्षा घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीसाठी दि.३१/०८/२०२८ पर्यंत टीईटी/ सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी कालावधी निश्चित केलेला आहे.
त्या निर्णयाच्या अधीन राहून जे सेवा जेष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र आहेत आणि त्यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक त्या सर्व शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेले आहेत अशा सर्वांना पदोन्नतीची संधी देऊन नैसर्गिक न्यायाप्रमाणे संधी द्यावी. विद्यार्थी व शाळा विरोधी संच मान्यता धोरण रद्द करण्यात यावे. बीएलओ कामातून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता करावी. गावात इतर कोणतेही कर्मचारी उपलब्ध नसतील तरच शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करावे असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील स्थानिक पातळीवर प्राथमिक शिक्षकांनाच या कामात जुंपले जाते सध्या एस आय आर जे काम सुरू असताना बीएलओ कामाच्या अतिरिक्त ताना मुळे शिक्षकांचे मानसिक व शारीरिक खचकरण होत आहे.
त्याचा थेट परिणाम शालेय कामकाजावर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. तसेच २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि पदवीधर विशेष शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळा, मुख्याध्यापक संघ शिक्षक संघटना यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी बशीर तांबोळी, बिबीशन पाटील लालासाहेब मगर, पवन सूर्यवंशी, कल्याण बेताळे, प्रशांत माने, जयपाल शेरखाने, बळवंत घोगरे, मुख्याध्यापक सचिन कुंभार यांच्यासह शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


