धाराशिव औसा /रस्त्याचा कायापालट अखेर निश्चित! जीवघेण्या रस्त्याला मिळणार नवे आयुष्य! चौपदरीकरणासह 45.68 कोटींच्या विकास कामांना मंजुरी – आ राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव Lokvichar – लोकविचार
धाराशिव शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि अनेक वर्षांपासून जीवघेणा ठरलेला धाराशिव–सारोळा मार्ग अखेर नव्या स्वरूपात विकसित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांनी भातांब्रा–धाराशिव–सारोळा–शिवली–बोरफळ रस्त्याच्या सुधारित आराखड्यास मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
सध्या धाराशिव–सारोळा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मोठमोठे खड्डे, वाहतुकीची प्रचंड कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, असंख्य जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाची आणि सुधारित विकासकामांची मागणी सातत्याने होत होती.
एमएसआयडीसीने मंजूर केलेल्या सुधारित आराखड्यानुसार जिजाऊ चौक ते सांजा चौकच्या पुढे सुमारे ९९० मीटरपर्यंत चारपदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर आणखी १.६७ किलोमीटर अंतरापर्यंत चौपदरीकरण होणार आहे. तसेच सांजा गाव परिसरात ६०० मीटर आणि सारोळा गाव परिसरात ७५० मीटर अतिरिक्त चौपदरीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे.
शहरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जिजाऊ चौक ते सांजा चौकदरम्यान ४.२४४ किलोमीटर लांबीची आरसीसी बंदिस्त गटारे व पदपथ उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी निचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, तसेच पादचाऱ्यांना सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील.
याशिवाय एमएसईबी उपकेंद्र ते सांजा चौक या मार्गावर ३६० मीटर स्मार्ट स्ट्रीट विकसित करण्यात येणार असून, या परिसराचे आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण केले जाणार आहे. आवश्यक ठिकाणी सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, पाइप कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि इतर पूरक कामांचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
या सुधारित आराखड्यात सुमारे ४५.६८ कोटी रुपयांच्या अतिरिक्त विकासकामांचा समावेश करण्यात आला असून, काही पूर्वनियोजित कामांमध्ये आवश्यक बदल करून संपूर्ण प्रकल्प आर्थिकदृष्ट्या संतुलित ठेवण्यात आला आहे.
याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, धाराशिव शहराचा नियोजनबद्ध विकास, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय, पावसाळ्यातील पाणी निचरा, सुरक्षित पदपथ आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकल्पामुळे धाराशिव शहर आणि परिसराच्या विकासाला निश्चितच नवी गती मिळेल.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


