धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!
नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेखएकीकडे कडक उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांची दहशत, अशा दुहेरी संकटात तुळजापूर तालुक्यातील मेंढपाळ सापडले आहेत. जळकोट शिवारात सोमवारी दुपारी झालेल्या एका भीषण हल्ल्यात वन्य प्राण्यांनी तब्बल ७५ मेंढ्यांच्या पिलांचा म्हणजेच कोकरांचा फडशा पाडला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.भरदुपारी शेडवरच हल्ला नेहमीप्रमाणे मेंढपाळ आपल्या मोठ्या मेंढ्या चारण्यासाठी शिवारात गेले होते. उन्हामुळे लहान पिलांना शेतातच असलेल्या शेडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र, दुपारी दीडच्या सुमारास निर्मनुष्य ठिकाण पाहून वन्य प्राण्यांनी या शेडवर हल्ला केला. या हल्ल्यात ६३ पिलांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ पिलांनी नंतर प्राण सोडले.या घटनेत दयानंद भोगे, मनोज कदम, बालाजी सोनटक्के, हरिबा सोनटक्के, दत्ता सोनटक्के, अमोल सुरवसे आणि राजेंद्र भोगे या मेंढपाळांची कोकरे दगावली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हे सर्व व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.”आम्ही जगायचे कसे? वर्षभराची मेहनत एका क्षणात संपली. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी पीडित मेंढपाळांनी केली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. वन्य प्राण्यांचा हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याचा तपास वनविभाग करत आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


