“रिलस्टार” स्वच्छता सभापतींचा फक्त स्टंटबाजीवर भर; धाराशिव शहर मात्र घाणीच्या विळख्यात दीड महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; सफाई कर्मचाऱ्यांचा संप सुरू, शहरातील स्वच्छतेचा बोजवारा
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मागील दीड महिन्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला असून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. आधीच शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली असताना आता संपामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छता सभापतींच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वतःच्या स्वच्छता विभागाकडे लक्ष देण्याऐवजी इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे, विविध ठिकाणी जाऊन रिल्स काढणे, सोशल मीडियावर स्टंटबाजी करणे आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त असलेल्या “कानफुके रिलस्टार” सभापतींमुळे शहरातील मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
नगरपरिषदेकडे शहरातील कचरा उचलण्यासाठी आवश्यक घंटागाड्या व यंत्रणा उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसत आहे. ठेकेदाराकडून आधीच कमी मजुरांवर शहराची स्वच्छता सुरू होती. त्यातच मजुरांचे पगार रखडल्याने आता उपलब्ध कर्मचारीही संपावर गेल्यामुळे शहरातील बहुतांश भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे.
माहितीनुसार, यापूर्वी दीड ते दोन महिन्यांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला तुटपुंजी रक्कम देण्यात आली होती. त्या आधारावर आतापर्यंत स्वच्छतेचे काम सुरू ठेवण्यात आले. मात्र पुन्हा एकदा पगार रखडल्याने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे आता नगरपरिषद सत्ताधारी / प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, ठेकेदारांची देणी कधी अदा होणार आणि शहरातील स्वच्छता पूर्ववत कधी होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
याबाबत स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सकाळी सर्व महिलांना कामावर जाण्यास सांगितले होते. ठेकेदारामार्फत दुपारी चार वाजेपर्यंत पगार होईल असे सांगण्यात आले होते. त्या शब्दावर काही महिला कामावर गेल्या आहेत. पगार झाल्यानंतर सर्व कर्मचारी पुन्हा कामावर येतील.” तसेच घंटागाडी १९ चालक संपावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकीकडे नागरिकांना स्वच्छ, सुंदर शहराच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात धाराशिव शहर घाणीच्या विळख्यात अडकले आहे. “रिल्स” आणि प्रसिद्धीपेक्षा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


