आरटीओ हेराफेरी प्रकरणात पोलिस तपास निर्णायक टप्प्यात; अधिकारी-कर्मचारी, दलालांच्या भूमिकेची चौकशी वेगात
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी हस्तक्षेप करून परिवहन विभागातील गैरप्रकारांवर उच्चस्तरीय कारवाई करावी – नागरिकांची जोरदार मागणी
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित चारचाकी वाहन हस्तांतरण, बनावट कागदपत्रे, संशयास्पद आरटीओ नोंदणी आणि दलालांच्या साखळीशी संबंधित प्रकरणात पोलिस तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रकरणात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांचा सहभाग असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या घडामोडींमुळे हे प्रकरण केवळ वाहन फसवणुकीपुरते मर्यादित नसून, संगनमताने रचलेल्या मोठ्या गैरव्यवहाराचे स्वरूप धारण करत असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.सदर वाहन हस्तांतरण व्यवहार २५ सप्टेंबर २०२५ रोजी परंडा आरटीओ कॅम्पमध्ये पार पडल्याचे समोर आले होते. वाहन मालक धाराशिव येथील, कथित खरेदीदार पुणे येथील आणि व्यवहाराची नोंदणी परंडा कॅम्पमध्ये झाल्याने सुरुवातीपासूनच या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यानंतर १० डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने आरटीओ कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल करून वाहन नोंदणी प्रक्रियेत अफरातफर, बनावट कागदपत्रे, पत्त्यात फेरफार आणि बेकायदेशीर नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला.या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परंडा कॅम्पमध्ये कार्यरत संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला. त्यानुसार २४ डिसेंबर २०२५ रोजी आरटीओ निरीक्षकांनी आपला खुलासा सादर केला. मात्र, या प्रक्रियेत तक्रारदाराच्या मूलभूत आक्षेपांचे समाधान न झाल्याने त्यांना पोलीस स्टेशनकडे पाठविण्यात आले. त्याअनुषंगाने तक्रारदाराने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी स्वतंत्र तक्रारी दाखल करून संशयितांनी फसवणूक, कागदपत्रांमध्ये फेरफार, वाहनाचा बेकायदेशीर ताबा आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप पुन्हा अधोरेखित केला.पोलिस तपासात या प्रकरणातील संशयितांपैकी चंदन बळीराम यादव यांनी पुणे येथून टपालाद्वारे आपला जबाब सादर केला आहे, तर दुसरे संशयित सिताराम शेंडगे यांचा जबाब अद्याप नोंदवायचा आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ खरेदीदार किंवा मध्यस्थच नव्हे, तर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित दलाल यांची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. वाहन हस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, डुप्लिकेट आरसी बुक प्रक्रिया, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आणि अंतिम नोंदणी प्रक्रियेत नियमबाह्य हालचाली झाल्या का, याचा बारकाईने तपास सुरू आहे.तपास अधिकारी पोलिस नाईक बालाजी मुंढे यांनी सांगितले की, “संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक पुरावा, जबाब, कागदपत्रे आणि संबंधितांची भूमिका तपासली जात आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी व दलाल यांचा सहभाग असल्याचा संशय असून, तपास पूर्ण होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने संबंधित सर्वांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील. पुढील काही दिवसांत मोठी कारवाई अपेक्षित आहे.”या वक्तव्यानंतर जिल्ह्यात आरटीओ कार्यालयातील दलालशाही, बनावट नोंदणी प्रक्रिया आणि कॅम्प व्यवस्थेच्या गैरवापराबाबत संताप अधिक वाढला आहे. ग्रामीण नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या तालुका कॅम्पचा वापर काही जणांनी बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला का, हा मूलभूत प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.विशेष म्हणजे, राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या कार्यकाळातच परिवहन विभागाशी संबंधित असे गंभीर प्रकार समोर येत असल्याने, या प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी नागरिकांची मागणी अधिक जोर धरत आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी, दलाल आणि संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करून जिल्ह्यातील परिवहन प्रशासनावरील जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.धाराशिव जिल्ह्यातील या प्रकरणामुळे परिवहन विभागातील व्यवहार पारदर्शक आहेत की दलालांच्या जाळ्यात अडकले आहेत, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपास आणि प्रशासनाची पुढील भूमिका आता निर्णायक ठरणार असून, दोषींवर कारवाई होते की नाही, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.पुढील भागात : बनावट आधारकार्ड, पोस्ट ऑफिसमधून कागदपत्रांवर ताबा, परंडा कॅम्पमध्ये दुसरा व्यक्ती उभा करून कशी केली फसवणूक? कोण कोण आहे या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी?
लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकदसंपादक : अमजद सय्यद | 8390088786


