कला केंद्रमुक्त धाराशिव; ६ परवाने रद्द, पुनर्वसनासह प्रशासनाची मोठी कारवाई! छुप्या ‘छमछम’ला आळा घालण्याचे आव्हान…
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची निर्णायक मोहीम ६ नवीन प्रस्तावांवर प्रशासनाची कडक नजर
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद व बेकायदेशीर प्रकारांवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊले उचलत जिल्ह्याला ‘कला केंद्रमुक्त’ करण्याच्या दिशेने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी आणि साई या सहा कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून काही ठिकाणी केंद्रांना सीलही ठोकण्यात आले आहे.पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या स्पष्ट निर्देशानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलिस अधीक्षक रितु खोकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील कला केंद्र व्यवसायातील अनियमिततेवर मोठा आळा बसला आहे.दरम्यान, या कारवाईमुळे संबंधित महिला कलाकार व कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक पुढाकार घेत पुनर्वसनाची तयारी दर्शवली आहे. प्रभावित महिलांना रोजगार, उद्योग प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यातील काही कला केंद्रांवर कारवाई झाली असली तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने ‘छमछम’ सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर हालचालींवर पूर्णतः नियंत्रण मिळवणे हे प्रशासनासमोरचे पुढील मोठे आव्हान ठरणार आहे. काही स्थानिक पोलिस, महसूल अधिकारी किंवा गावपुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.विशेष म्हणजे, विद्यमान सहा परवाने रद्द करण्यात आले असतानाच नवीन सहा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. कला केंद्र व्यवसायाशी संबंधित काही ठराविक मंडळी नव्या नावांनी पुन्हा परवाने मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.बाबासाहेब घाटे यांच्या ‘पिंजरा’ आणि अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून त्यांनी नव्याने अर्ज सादर केल्याची माहिती आहे. याशिवाय ‘नटरंग’, ‘चंद्राई’, ‘अंबिका’, ‘रेणुका’ आणि ‘प्यासा’ या नावांनी विविध भागांत नवीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने प्रशासनाने अद्याप एकाही नव्या प्रस्तावास मंजुरी दिलेली नाही.धाराशिव जिल्ह्यातील काही भाग कला केंद्रांचा अड्डा बनण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, गणेश शिंदे, तहसीलदार मृणाल जाधव, प्रकाश मेहेत्रे, हेमंत ढोकळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.धाराशिवच्या इतिहासात प्रथमच सर्व कला केंद्र परवान्यांवर व्यापक कारवाई होत असल्याने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह संपूर्ण प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ‘कला केंद्रयुक्त’ ते ‘कला केंद्रमुक्त’ असा प्रवास प्रशासनाने प्रभावीपणे घडवून आणल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


