तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?
धाराशिव | लोकविचार
जिल्हा होमगार्ड कार्यालयात घुसून महिला होमगार्ड (कर्मचाऱ्यांना) दमदाटी, शिवीगाळ करत शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला कथित तोतया पोलीस राम बोंदर अखेर धाराशिव शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार राहिलेल्या या आरोपीला अत्याधुनिक तांत्रिक तपास, लोकेशन ट्रॅकिंग आणि विशेष पथकाच्या नियोजनबद्ध कारवाईत अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, धाराशिव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि विभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी विशेष पथक तयार करून सातत्याने आरोपीचा माग काढला. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने आणि प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
विशेष म्हणजे, १९ जून रोजी ‘लोकविचार’ने “तोतया पोलिसाला अभय कुणाचे? शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा का नाही; होमगार्ड प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!” या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणातील गंभीर बाबी पुढे आणल्या होत्या. शासकीय कार्यालयात घुसून सुरू असलेल्या अधिकृत कामकाजात हस्तक्षेप, महिला कर्मचाऱ्यांना धमकावणे, अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न आणि प्रशासनावर दबाव आणल्याच्या आरोपांची दखल घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत अखेर बोंदर ला अटक करण्यात यश आले.
मात्र आरोपीला अटक झाल्यानंतरही एक महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जिल्हा होमगार्ड कार्यालयात घडलेल्या प्रकारात शासकीय कामकाजात प्रत्यक्ष अडथळा निर्माण झाल्याचा आरोप असताना, भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासंदर्भातील तरतुदींनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तपास यंत्रणेकडून आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), संपर्क, लोकेशन हिस्ट्री आणि डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तपासातून आरोपीचे नेमके संबंध कोणाशी होते, तो शासकीय कार्यालयात इतक्या सहजतेने कसा वावरत होता, त्याला कुणाचे संरक्षण होते का आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासारख्या अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि सर्वसमावेशक व्हावा, आरोपीच्या मोबाईलसह सर्व डिजिटल पुराव्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात यावे आणि आवश्यक असल्यास संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तोतया पोलीस अखेर गजाआड गेल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी, शासकीय कामात अडथळा, शासकीय कार्यालयातील अनधिकृत हस्तक्षेप आणि संभाव्य संगनमताच्या आरोपांबाबत पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार | सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद
मो. 8390088786


