एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी
धुता येथील अझर जावेद शेख यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
धाराशिव लोकविचार :
तालुक्यातील धुता गाव ते धुता पाटी परिसरातील रस्त्यावर एमएसईबी वीज लाईनच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धुता येथील अझर जावेद शेख यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धुता गाव ते धुता पाटी या रस्त्यालगत असलेली शेकडो हिरवीगार झाडे कोणतीही योग्य परवानगी न घेता तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन न करता तोडण्यात आली आहेत. या झाडांच्या कत्तलीमुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिकांच्या मते, झाडांची बेसुमार तोड झाल्यामुळे भविष्यात उष्णतेत वाढ, पावसाचे प्रमाण कमी होणे तसेच पर्यावरणीय असंतुलन निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील झाडतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.यासोबतच संबंधित अधिकारी, ठेकेदार व जबाबदार व्यक्तींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अझर जावेद शेख यांनी दिला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


