सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष
धाराशिव शहरातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वरूडा उड्डाण पुलाजवळील श्रीराम हायवे सर्विसेस सीएनजी व पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी महामार्गावर मोठ्या रांगा लागत आहेत. या पंपावर सतत सीएनजीचा तुटवडा भासत असून वाहनधारकांना दोन-दोन तास रांगेत उभे राहून गॅस भरावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.श्रीराम हायवे सर्विसेस सीएनजी व पेट्रोल पंपा सोलापूर-धुळे राष्ट्रीय मार्गावर असल्यामुळे दूरवरून अनेक वाहनधारक येतात. त्यामुळे वाहनांचीही मोठी गर्दी होत आहे. सीएनजी भरण्यासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे महामार्गावर अनेक किलो मीटरपर्यंत वाहनांची साखळी तयार होत आहे. त्यामुळे वरूडा उड्डाण पुलाजवळ धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजेउड्डाण पुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे जर एखाद्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास खाली उभ्या असलेल्या वाहनांवर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखादे वाहन उभ्या असलेल्या वाहनांवर आदळले व त्यातील गॅसचा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाण पुलालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरही देखील वाहन चालवताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. याचा फटका शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना बसत आहे.
या पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन गॅस भरण्यासाठी येत असल्यामुळे वाहनाची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे पंपचालकाने स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याऐवजी पंपाच्या परिसरातच व्यवस्थित व नियंत्रित राहण्यास मदत होईल.
जिल्हा प्रशासन या गंभीर समस्यकडे अक्षम्य दुर्लक्ष का करीत आहे ? शहरालगत असल्यामुळे नागरिकांची वाहने या मार्गावरून सातत्याने ये-जा करतात. शिवाय अनेक वेळा इतर कारणावरून देखील या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लवकर न सोडविल्यास भविष्यात अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


