मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ नगर येथे २५० नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी – दिपाली धनंजय पाटील
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त नगरसेविका सौ. दिपाली धनंजय पाटील व नगरसेवक राहुल काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थनगर येथील राम मंदिर परिसरात आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल २५० नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली.
केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचारांची सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने हे कार्ड काढणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देणारा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले कार्ड सहज उपलब्ध झाले.
यावेळी युवा नेते मल्हार दादा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केक कापून त्यांच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिरासारखे उपक्रम अधिकाधिक राबविण्याची गरज असल्याचेही यावेळी मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास धाराशिव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नेहा ताई काकडे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, बांधकाम सभापती अभिजित काकडे, नियोजन सभापती आकाश तावडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. वैशालीताई सोनवणे, नगरसेवक राहुल काकडे, सौ. राजकन्या अडसूळ, सिद्धार्थ बनसोडे, अक्षय जोगदंड, पृथ्वीराज दंडनायक, अमोल राजेनिंबाळकर यांच्यासह गिरीश कुलकर्णी, अजित बडवे, राजेश परदेशी, शिवानी परदेशी, निळकंठ अघोर, शंकर जाधव, प्रकाश भोसले, राघव पाटील, गजानन मसलेकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. वाढदिवसाचे औचित्य साधत नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून राबविण्यात आलेल्या आयुष्मान भारत कार्ड शिबिरामुळे शेकडो लाभार्थ्यांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


