अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!
“नळांना पाणी नाही, गावात सांडपाण्याचे साम्राज्य”; प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचा संताप
धाराशिव लोकविचार
धाराशिव तालुक्यातील मौजे आळणी येथील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन, नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत, या मागण्यांसाठी आळणी ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह देण्यात आले.
गावामध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे गावातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाळा तोंडावर असताना नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे रखडल्याने गावात साथीच्या रोगांचा धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सोडवला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
यावेळी अभयसिंह वीर, अशोक गाडे, विश्वजीत पाटील, युवराज कोळी, अजय गाडे, रियाज सय्यद, शुभम महामुनी आदींच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, पाणीपुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात येईल तसेच नालेसफाई व संबंधित इतर कामे पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत दिल्या जातील, असे आश्वासन प्रियंवदा महाडदळकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
तथापि, केवळ आश्वासनांवर समाधान नसून कामे प्रत्यक्षात सुरू झाली नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


