पाणी प्रश्नाचे कारण देत गावकऱ्यांची दिशाभूल करून मुंबई वारी? कला केंद्रांसाठी ‘लॉबिंग’ला वेग, परवान्यांसाठी पडद्यामागे हालचाली!
कला केंद्रांसाठी पुन्हा ‘लॉबिंग’ला वेग; मुंबई दौऱ्याच्या आड परवान्यांसाठी हालचाली, प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?
धाराशिव Lokvichar – लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रांवर प्रशासनाने कारवाई करून अनेक परवाने रद्द केल्यानंतर आता पुन्हा नवीन परवाने मिळविण्यासाठी तसेच रद्द झालेले परवाने पूर्ववत करण्यासाठी काही कला केंद्र चालक व संबंधितांची ‘लॉबी’ सक्रिय झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही गावपुढाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्वाची भेट घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
माहितीनुसार, नुकतेच एका शिष्टमंडळाने मुंबई दौरा केला. गावकऱ्यांसमोर हा दौरा पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नासाठी असल्याचे सांगण्यात आले. मात्र मंत्रालयात पोहोचल्यानंतर कला केंद्रांचा विषय प्रामुख्याने मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या काळात कला केंद्रांबाबत काही आश्वासने देण्यात आली होती. त्या आश्वासनांची आठवण करून देत संबंधितांनी राजकीय नेतृत्वाकडे साकडे घातल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, नेतृत्वाने शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर मंत्रालयातील विविध विभागांमध्ये त्यांना मार्गदर्शन (फोटोसेशन) करण्यात आले. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही संबंधितांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असला तरी त्यांनाही अपेक्षित दिलासा मिळालेला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय माध्यमातून प्रशासनावर प्रभाव टाकण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर तसेच महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत जिल्ह्यातील अनेक कला केंद्रांची तपासणी केली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर काही परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले, तर काहींचे नूतनीकरण नाकारण्यात आले. या कारवाईला अनेक लोकप्रतिनिधींनीही सामाजिक हिताचा मुद्दा म्हणून पाठिंबा दिला होता.
कला केंद्रांमुळे परिसरातील महिला, नागरिक आणि अनेक कुटुंबांना विविध प्रकारचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. गुन्हेगारी, हाणामाऱ्या, अवैध धंदे आणि सामाजिक अस्वस्थता वाढत असल्याचेही अनेकदा समोर आले होते. प्रशासनाच्या कारवाईनंतर अशा घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे गावकऱ्यांची दिशाभूल करीत गावातील पाणीपुरवठ्याचा विषय पुढे करून पुन्हा कला केंद्रांना परवानगी देण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
धाराशिवमध्ये सहा कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असले तरी त्याचवेळी नवीन सहा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाल्याची माहिती आहे. देवी-देवतांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या काही कला केंद्रांमध्ये पूर्वी गंभीर गैरप्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. काही ठिकाणी हाणामाऱ्या, खून, लैंगिक शोषण तसेच वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यांचाही तपासात उल्लेख झाला होता. यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.
तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी आणि साई या कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्यापैकी बाबासाहेब घाटे यांच्या ‘पिंजरा’ आणि अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, ‘नटरंग’, ‘चंद्राई’, ‘अंबिका’, ‘रेणुका’ तसेच इतर काही नव्या कला केंद्रांसाठी विविध व्यक्तींनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र अनेक प्रस्तावांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व इतर त्रुटी असल्याने प्रशासनाने अद्याप एकाही नवीन कला केंद्राला परवाना मंजूर केलेला नाही.
दरम्यान, काही ठिकाणी मोठ्या इमारती उभारून भविष्यात कला केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा असून या व्यवसायात काही प्रभावशाली व्यक्तींची छुपी गुंतवणूक असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रशासनाची पुढील भूमिका आणि नवीन परवान्यांबाबतचा निर्णय याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


