प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; नळदुर्गमध्ये भव्य मोटरसायकल रॅलीने गाजवला महाराष्ट्र दिन नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेख.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या धोरणांमुळे दुहेरी संकटात सापडला आहे. थकीत ऊस बिल, पीकविमा आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला अन्याय याकडे लक्ष वेधण्यासाठी *शेतकरी संघर्ष समितीच्या* वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गुळहळळी पाटी ते नळदुर्ग अशी भव्य ‘मोटरसायकल रॅली’ काढण्यात आली. या रॅलीद्वारे शेतकरी नेत्यांनी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर सडकून टीका केली.प्रशासकीय दिरंगाईवर ‘प्रहार नळदुर्ग येथील अक्कलकोट रोडवर रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकरी नेते दिलीप जोशी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासन तुटपुंजी मदत देऊन थट्टा करत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.यावेळी *सरदारसिंग ठाकूर* यांनीदेखील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचला. रॅलीमध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या: राष्ट्रीय महामार्ग ६५२,भूसंपादनाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. थकीत ऊस बिले तात्काळ मिळावीत आणि शेतकऱ्यांच्या हिताची ‘एक रुपयात पीकविमा’ योजना पुन्हा सुरू करावी. आर्थिक संकटात असलेल्याशेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करून, भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. कूरनूर धरणाच्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे झाले असून त्याचीतात्काळ उच्चस्तरीयचौकशी व्हावी. या मोटरसायकल रॅलीत शेतकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये व्यंकट पाटील, पंडित पाटील, विक्रम निकम, महेश घोडके, महादेव बिराजदार, पंडित निकम, नरसिंग निकम, आजमोद्दीन शेख, दिलीप पाटील, काशिनाथ काळे, तोलू पाटील, बंडू मोरे, हरी सुरवसे, गुलाब शिंदे यांच्यासह मानसिंग ठाकूर, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर, दशरथसिंग ठाकूर, श्रीकांत पोतदार, पीरपाशा इनामदार व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना आधीच या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, आता रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



