बीडमध्ये किट वाटप घोटाळ्यावर आत्मदहनाचा प्रयत्न; धाराशिवातही कामगार योजनांतील भ्रष्टाचारावर संताप, ‘आशीर्वाद कुणाचा?’
बांधकाम कामगारांच्या हक्काच्या योजनांत दलाली, बोगस लाभार्थी आणि लाखोंच्या गैरव्यवहाराचे आरोप; बीडनंतर धाराशिव प्रशासनावरही चौकशीचा दबाव! धाराशिव
धाराशिव – लोकविचार
बीड जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठीच्या किट वाटप योजनेत भ्रष्टाचाराचा मोठा भडका उडाला असून, लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली होत असल्याच्या गंभीर आरोपांमुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने दलित पॅंथरचे युवा जिल्हाध्यक्ष प्रेम कांबळे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत प्रशासनाला थेट इशारा दिला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, मात्र या घटनेने संपूर्ण राज्यातील कामगार विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.बीडमधील या प्रकरणात सरकारी अधिकारी, ठेकेदार आणि एजन्सी यांच्या संगनमतातून गरीब बांधकाम कामगारांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप होत असताना, धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या गैरव्यवहारांबाबत अनेक वर्षांपासून सातत्याने तक्रारी होत आहेत. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि आंदोलकांनी वेळोवेळी आवाज उठवला, आंदोलन केले, निवेदने दिली; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव दिसून येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.धाराशिवमध्ये कामगार योजनांमध्ये बोगस लाभार्थी, दलाली, लाभासाठी पैशांची मागणी आणि पात्र कामगारांना योजनांपासून वंचित ठेवण्याचे आरोप वारंवार होत असतानाही, या सर्व प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. “या भ्रष्ट यंत्रणेला नेमके आशीर्वाद कुणाचा?” असा सवाल आता सर्वसामान्य कामगारांमधून उपस्थित होत आहे.बीडसारखी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडल्यानंतरच शासन आणि प्रशासन जागे होणार का? कामगारांच्या नावावर सुरू असलेल्या योजनांमधील बोगस लाभार्थी, दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न आता नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून विचारले जात आहेत.राज्य शासनाने तातडीने बीड आणि धाराशिवसह सर्व जिल्ह्यांतील कामगार विभागाच्या योजनांची स्वतंत्र चौकशी करून भ्रष्टाचाराचे जाळे उद्ध्वस्त करावे, अन्यथा कामगारांच्या रोषाचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


