जळकोट-नळदुर्ग-इटकळमध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य; ‘मुख्य बुकींना अभय, मजुरांवरच कारवाई’पत्रकार सुनील बनसोडे यांचा महाराष्ट्र दिनी नळदुर्ग ठाण्यासमोर घंटानादआंदोलन
नळदुर्ग (प्रतिनिधी – अझहर शेख) : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळकोट, इटकळ आणि नळदुर्ग शहर परिसरात मटका, जुगार आणि चक्री यांसारख्या अवैध धंद्यांनी अक्षरशः विळखा घातला असून, पोलीस प्रशासन केवळ दिखाव्यापुरती कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार सुनील बनसोडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या कारवाया फक्त हाताखालच्या नोकर-चाकरांपुरत्याच मर्यादित राहत असून, मुख्य बुकी आणि मूळ मालकांना जाणीवपूर्वक अभय दिले जात असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.या निषेधार्थ आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात १ मे महाराष्ट्र दिनी नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.पत्रकार सुनील बनसोडे यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, जळकोट हे सध्या मटका व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनले असून बसस्थानक, मुख्य चौक आणि सार्वजनिक वर्दळीच्या भागात खुलेआम मटका व जुगार अड्डे सुरू आहेत. या ठिकाणी राजरोसपणे व्यवसाय सुरू असतानाही पोलीस केवळ किरकोळ कारवाई करून आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवेदनानुसार, मटका अड्ड्यांचे मूळ मालक मोकाट फिरत असताना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांवर किंवा एजंटांवर गुन्हे दाखल करून कारवाईचा देखावा उभा केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नळदुर्ग, जळकोट आणि इटकळ ही तालुक्यातील महत्त्वाची गावे असून या भागात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे युवक आणि तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत लोटली जात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.यापूर्वी २३ जानेवारी २०२६ रोजी देखील यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप बनसोडे यांनी केला आहे. त्यांनी ३० एप्रिलपर्यंत मुख्य मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा अल्टिमेटम दिला होता. तरीही कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने अखेर महाराष्ट्र दिनी घंटानाद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.“पोलीस प्रशासन केवळ लहान माशांवर जाळे टाकत आहे, पण मुख्य मगरींना कोणाचे संरक्षण आहे? जोपर्यंत मुळ मालकांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा थेट इशारा पत्रकार सुनील बनसोडे यांनी दिला.या आंदोलनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांनाही सादर करण्यात आली आहे.स्थानिक नागरिकांमध्येही या प्रश्नावर तीव्र नाराजी असून, आता तरी नळदुर्ग पोलीस प्रशासन झोपेतून जागे होऊन मुख्य बुकी आणि अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


