धाराशिव बस डेपोचा 40 वर्षांचा विकास रखडला; पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनीच घ्यावा आधुनिकीकरणाचा निर्णय
पावसाळ्यात चिखल, कर्मचाऱ्यांची गैरसोय; महाराष्ट्र दिनी कामगारांना न्याय देत धाराशिव आगाराच्या नूतनीकरणाची घोषणा होणार का?
धाराशिव | लोकविचार
धाराशिव बसस्थानक व बस डेपोची उभारणी सन 1980 ते 1985 दरम्यान करण्यात आली. मात्र तब्बल चार ते पाच दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही बस डेपोमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. डेपो परिसरातील काँक्रीटीकरण/डांबरीकरण, अंतर्गत रस्ते, पावसाळी निचरा व्यवस्था यांसारखी अत्यावश्यक कामे यावेळी केली असून त्यानंतर आजपर्यंत तेथील काम न झाल्याने कर्मचाऱ्यांसह चालक-वाहकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.धाराशिव बस डेपोमध्ये दररोज शेकडो बस विविध कामांसाठी दाखल होत असतात. डिझेल भरणे, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, पार्किंग यांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र डेपोतील अंतर्गत परिसर अत्यंत जीर्ण झालेला असून पावसाळ्यात संपूर्ण जागा चिखलमय बनते. परिणामी कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी निर्माण होतात, वाहन हालचालीत अडथळे येतात आणि कामगारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.विशेष म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे प्रतापराव सरनाईक यांनी राज्यभर एसटी महामंडळासाठी विविध सुधारणा, बसस्थानकांचे नूतनीकरण आणि नवीन योजनांची अंमलबजावणी केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना स्वतःच्या पालकमंत्रीपदाच्या जिल्ह्यातील धाराशिव बस डेपो मात्र अद्याप मूलभूत विकासापासून वंचित असल्याची भावना नागरिक व कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव आगारातील कामगारांची व्यथा जाणून घेत, या डेपोच्या काँक्रीटीकरणासह संपूर्ण आधुनिकीकरणासाठी तात्काळ मंजुरी जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बस डेपोचे आधुनिकीकरण, सुसज्ज सुविधा, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित कार्यव्यवस्था निर्माण करण्याची सुरुवात धाराशिवमधूनच व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री म्हणून प्रतापराव सरनाईक यांनी या रखडलेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत कामगारांना न्याय द्यावा, तसेच धाराशिव बस डेपोचा विकास आराखडा तातडीने मंजूर करून जिल्ह्यात विकासाचा नवा आदर्श निर्माण करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. महाराष्ट्र दिनी यासंदर्भात मोठी घोषणा होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


