सत्ताधारी नगरसेवक अभिजित पतंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली रस्ते, स्वच्छता आणि गटारींची बिकट अवस्था
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारी आणि अपुऱ्या स्वच्छता व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असतानाच आता सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अभिजीत पतंगे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र दोन निवेदने देत खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था सुधारण्याबरोबरच निष्काळजी ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाच त्यांच्या नगरसेवकांकडून अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आल्याने शहरातील नागरी सुविधांबाबतची वस्तुस्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नागरिक सातत्याने विविध समस्यांकडे लक्ष वेधत असताना आता लोकप्रतिनिधींनीच प्रशासनाला जाब विचारल्यामुळे या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पतंगे यांनी दिलेल्या पहिल्या निवेदनात शरद पवार हायस्कूल ते बोंबले हनुमान चौक या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे नमूद केले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनली असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे आणि तोपर्यंत सर्व खड्डे भरून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या निवेदनात प्रभाग क्रमांक ६ मधील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संपूर्ण प्रभागासाठी केवळ एक घंटागाडी आणि दोन सफाई कर्मचारी कार्यरत असल्याने नियमित साफसफाई होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. परिणामी अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून तुंबलेल्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत आहे. साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करत आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धाराशिव शहरात पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली अनेक विकासकामे अद्याप रखडलेली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही ठिकाणी कामे अपूर्ण असून काही ठिकाणी दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून लोकप्रतिनिधींनाही मतदारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील रस्ते, स्वच्छता आणि पावसाळी नियोजन या मूलभूत विषयांवर अधिक प्रभावी उपाययोजना होण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. नगराध्यक्ष, संबंधित सभापती आणि प्रशासन यांनी समन्वय साधून नागरी समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या सोशल मीडियावर विकासाची विविध चित्रे आणि दावे समोर येत असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामांवर भर देत रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही काळाची गरज असल्याचे मत शहरातून व्यक्त होत आहे.
आता सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच प्रशासनासमोर शहरातील प्रश्न मांडल्यामुळे संबंधित यंत्रणा तातडीने हालचाल करून नागरिकांना दिलासा देणार की ही निवेदनेही इतर मागण्यांप्रमाणे फाइलपुरतीच मर्यादित राहणार, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


