एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटी सवलती कायम अफवांवर विश्वास ठेवू नका – धाराशिव विभागीय कार्यालयाचे स्पष्टीकरण
आधार कार्ड,मतदान ओळखपत्रावरही मिळणार एसटी योजनांचा लाभ; जिल्ह्यात 117 नोंदणी केंद्रे
धाराशिव | लोकविचार
:सध्या एसटी बसस्थानकांमध्ये एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध अफवा पसरवल्या जात आहेत. विशेषतः, एनसीएमसी कार्ड नसल्यास एसटीच्या विविध सवलती बंद होतील किंवा प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड हे सध्या अनिवार्य नसून, कार्ड नसले तरीही प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सर्व सवलती मिळत राहणार आहेत. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीस बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत, महिला सन्मान योजना यांसह इतर योजनांचा लाभ मिळत राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.एनसीएमसी कार्ड काढण्याची प्रक्रिया ही प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे. भविष्यात डिजिटल व्यवहार अधिक सुलभ व्हावेत, बस प्रवास अधिक सुसूत्र व्हावा आणि प्रवाशांना एकाच कार्डवर विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मात्र, याचा अर्थ सध्या सुरू असलेल्या सवलती बंद होतील असा अजिबात नाही.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर चुकीच्या संदेशांमुळे अनेक नागरिकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर धाराशिव विभागीय कार्यालयाने अधिकृत स्पष्टीकरण देत “अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या” असे स्पष्ट केले आहे.दरम्यान, धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या नोंदणीकृत 117 केंद्रे कार्यरत असून नागरिकांना या ठिकाणी एनसीएमसी नोंदणी करता येत आहे. ही नोंदणी प्रक्रिया तत्काळ बंद होणार नसून जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही एका केंद्रावर गर्दी करून गोंधळ निर्माण करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याने सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ही सेवा शेवटच्या घटकातील प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा महामंडळाचा प्रयत्न असून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर योजनांचे लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. तसेच, नोंदणी करताना राज्य परिवहन महामंडळाने निश्चित केलेली शुल्क रक्कमच भरावी. कोणालाही आगाऊ किंवा अतिरिक्त रक्कम देऊ नये. कोणी अतिरिक्त पैसे मागत असल्यास तात्काळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धाराशिव विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही माहिती समजल्यास ती खातरजमा करूनच विश्वास ठेवावा. अफवांमुळे निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा. एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटीच्या सर्व सवलती पूर्ववत सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभाग नियंत्रक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
धाराशिव लोकविचार “सत्य” शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


