‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – अमोल जाधव
धाराशिव लोकविचार
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नालाबांधणीकरण व रुंदीकरण’ योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2024-25 व 2025-26 मध्ये झालेल्या 155 कामांच्या त्रयस्थ तपासणीचा संपूर्ण अहवाल आणि प्रशासकीय व तांत्रिक कागदपत्रे जनतेसमोर सार्वजनिक करावीत, अशी मागणी शिवसेना तुळजापूरचे माजी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. जिल्ह्यात या योजनेंतर्गत जलसंपदा विभागाची 45 तर मृद व जलसंधारण विभागाची 110 अशी एकूण 155 कामे करण्यात आली आहेत.या कामांवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली असून, कोणत्याही कामात अनियमितता आढळली नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, केवळ प्रसिद्धीपत्रकातून ‘अनियमितता नाही’ असे सांगण्याऐवजी तपासणीचा कामनिहाय संपूर्ण अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
प्रत्येक कामाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, कामाचे आदेश, मोजमाप पुस्तिका (MB), पूर्णत्व प्रमाणपत्र, देयके, निधी वितरण, काढलेल्या गाळाचे प्रमाण आणि कामांची छायाचित्रे सार्वजनिक करावीत. तसेच त्रयस्थ तपासणी कोणत्या निकषांवर झाली आणि प्रत्येक कामाबाबत काय निष्कर्ष नोंदविण्यात आला, याची माहितीही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्व कागदपत्रे संबंधित कार्यालयात नागरिकांच्या पाहणीसाठी तसेच जिल्हा प्रशासन व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी आहे.
यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढून शासनाच्या निधीच्या वापराबाबत जनतेचा विश्वास दृढ होईल, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


