‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या 155 कामांचा तपासणी अहवाल जनतेसमोर आणा – मा.तालुकाध्यक्ष अमोल जाधव
धाराशिव लोकविचार
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नालाबांधणीकरण व रुंदीकरण’ योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सन 2024-25 व 2025-26 मध्ये करण्यात आलेल्या 155 कामांच्या त्रयस्थ तपासणीचा संपूर्ण अहवाल आणि संबंधित प्रशासकीय व तांत्रिक कागदपत्रे जनतेसाठी सार्वजनिक करावीत, अशी मागणी शिवसेना तुळजापूरचे मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले असून, माहितीस्तव संबंधित मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नालाबांधणीकरण व रुंदीकरण’ योजनेंतर्गत एकूण 155 कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये जलसंपदा विभागाची 45 तर मृद व जलसंधारण विभागाची 110 कामे असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या कामांबाबत विविध स्तरावर प्रश्न आणि आरोप उपस्थित झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत कामांची पडताळणी करण्यात आली. विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 155 कामांची पडताळणी पूर्ण झाली असून, कोणत्याही कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, केवळ प्रसिद्धीपत्रक अथवा अधिकृत निवेदनाद्वारे अनियमितता नसल्याचे सांगण्याऐवजी या तपासणीचा संपूर्ण अहवाल आणि प्रत्यक्ष कागदपत्रे जनतेसमोर आणणे आवश्यक असल्याचे अमोल जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
शासकीय निधीतून करण्यात येणारी कामे ही जनतेच्या पैशातून होत असल्याने संबंधित कामांची प्रशासकीय व तांत्रिक माहिती नागरिकांना उपलब्ध होणे हा सार्वजनिक हिताचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची मंजुरी, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, कामाचे आदेश, मोजमाप पुस्तिका (MB), पूर्णत्व प्रमाणपत्र, देयकांची माहिती, निधी वितरण, गाळ काढलेल्या कामाचे प्रमाण तसेच कामांची छायाचित्रे सार्वजनिक करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच त्रयस्थ तपासणी कोणत्या निकषांच्या आधारे करण्यात आली, तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली आणि प्रत्येक कामाबाबत नेमका काय निष्कर्ष नोंदविण्यात आला, याची कामनिहाय माहितीही जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सदर प्रकरणातील सर्व कागदपत्रे मृद व जलसंधारण विभागाच्या जिल्हा कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून द्यावीत. तसेच संबंधित चौकशी अहवाल व कागदपत्रे कार्यालयाच्या सूचना फलकावर लावावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर सर्व कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात यावीत. या कामांबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेली कार्यवाही आणि अंतिम निर्णय याची स्वतंत्र नोंदही सार्वजनिक करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.
“संबंधित विभागाने त्रयस्थ तपासणीत कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘क्लीन चिट’ देण्यात आली असल्याचे केवळ प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यापेक्षा त्यासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रे जनतेसमोर उपलब्ध करून देण्यात यावीत,” अशी भूमिका अमोल जाधव यांनी मांडली.यामुळे शासन आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल तसेच त्रयस्थ तपासणीची पारदर्शकताही सिद्ध होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
भविष्यात अशा योजनेंतर्गत होणाऱ्या सर्व कामांची काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि काम पूर्ण झाल्यानंतरची माहिती व छायाचित्रे सार्वजनिक करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, धरणे व तलावांमधील गाळ काढून त्याचा शेतीसाठी उपयोग करणे आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देणे हा आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राहणे आणि शासनाच्या निधीचा योग्य वापर झाल्याची खात्री जनतेला होणे आवश्यक आहे, असे अमोल जाधव यांनी स्पष्ट केले.
155 कामांशी संबंधित संपूर्ण त्रयस्थ तपासणी अहवाल, प्रशासकीय व तांत्रिक कागदपत्रे जनतेसाठी खुली करून ती कार्यालयात तसेच ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी त्यांनी जलसंधारण मंत्र्यांकडे केली आहे.
लोकवीचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

