“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”
धाराशिव – लोकविचार
शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या रस्त्यावरील अपूर्ण व निष्काळजी कामामुळे आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मात्र काम सुरू असताना आवश्यक सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संरक्षण कठडे, रेडियम चिन्ह, दिशादर्शक फलक किंवा इशारे नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.
५ मे २०२६ रोजी रात्री सांजा गावाजवळ पुलाच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
या सर्व घटनांनंतरही संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्याकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. वारंवार सूचना देऊनही सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नाही. तसेच, MSIDC मार्फत सुरू असलेल्या या कामासाठी पूर्णवेळ देखरेख करणारा अधिकारी नसल्याने कामाचा दर्जा आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मराठवाडा विभागासाठी केवळ एकच कार्यकारी अभियंता नियुक्त असल्याने कामावर योग्य देखरेख होत नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. संबंधित अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून “आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपघातांची मालिका सुरू असताना देखील ठेकेदार व प्रशासन मूकदर्शक का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


