धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा
नळदुर्ग (प्रतिनिधी) अझहर शेख
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील पर्यटनाचा कणा असलेल्या नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी ‘महावारसा विशेष स्मारक योजने’ अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. एकट्या नळदुर्ग किल्ल्यासाठी सुमारे १०.८७ कोटी रुपयांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे या प्राचीन वास्तूचे रूप पालटणार आहे. नळदुर्ग किल्ला हा केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. या किल्ल्याचा इतिहास , मूळ बांधकाम कल्याणीच्या चालुक्य काळात झाले. सुरुवातीला हा किल्ला मातीची गढी होता. बहामनी काळात (१३५१ ते १४८०) याला भक्कम दगडी स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १६१३ मध्ये इब्राहिम आदिलशहा (द्वितीय) यांनी बोरी नदीवर बंधारा बांधून जगातील विस्मयकारक अशा ‘पाणी महल’ ची निर्मिती केली. हैदराबाद निजामाच्या ताब्यात राहिलेला हा किल्ला १९५३ पासून संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे.आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर, पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कंबर कसली आहे. नियुक्त वास्तुविशारदांनी १० कोटी ८७ लक्ष ५५ हजार ६९८ रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला असून, १६ ऑगस्ट २०२५ रोजी याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. तटबंदीचे मजबुतीकरण आणि भेगा पडलेल्या भिंतींना ‘ग्राऊटिंग’ करणे. ऐतिहासिक ‘पाणी महल’ आणि ‘उपळी बुरुज’ परिसराची विशेष डागडुजी. परिसरातील झाडेझुडपे काढणे, दगडी पाथवे निर्माण करणे आणि गार्ड रेलिंग बसवणे. परिसराचे शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण. पर्यटकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक आणि पायऱ्यांचे बांधकाम. “नळदुर्ग आणि परांडा हे किल्ले धाराशिव जिल्ह्याची ओळख आहेत. या निधीमुळे या वास्तूंचे मूळ सौंदर्य अबाधित राखण्यास मदत होईल. तसेच, पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.” पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन.गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यांना आता ‘महावारसा’ योजनेमुळे नवे जीवन मिळणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



