एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश
मुंबई लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार दिलीप लांडे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत राज्यभरातील एसटीची बसस्थानके, आगारे, कार्यालये आणि विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी हिरवा, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याचा सामूहिक संकल्प असल्याचे सांगितले. वाढते जागतिक तापमान, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे असून ती प्राणवायू पुरवतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, तापमान नियंत्रित ठेवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. त्यामुळे एक झाड लावणे म्हणजे भविष्यातील अनेक संकटांवर उपाय उभा करणे होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळ हे केवळ प्रवासी सेवा देणारे परिवहन माध्यम नसून समाजाशी नाळ जोडलेली सामाजिक संस्था असल्याने समाजहिताचे आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे हीदेखील एसटीची सामाजिक बांधिलकी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
वृक्षारोपण करून जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येक रोप जगविणे, त्याचे संगोपन करणे आणि संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी “एक कर्मचारी – एक वृक्ष” आणि “एक नागरिक – एक वृक्ष” हा संकल्प स्वीकारण्याचे आवाहन केले. एसटीच्या प्रत्येक आगारात, बसस्थानकात आणि कार्यालय परिसरात हिरवाई निर्माण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी आवाहन केले.
७८ व्या वर्धापन दिनानिमित्त “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


