आषाढी यात्रेसाठी एसटीची भव्य तयारी! ५,५०० विशेष बसेस धावणार; ४० भाविकांचे ग्रुप बुकिंग असल्यास गावातून थेट पंढरपूर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पंढरपूर लोकविचार
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या सुरक्षित, सुखकर आणि नियोजनबद्ध प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष एसटी बसेस चालविण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांचे ग्रुप बुकिंग झाल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
आषाढी यात्रा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक पार पडली. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत मंत्री सरनाईक यांनी यात्रेसाठी धावणाऱ्या सर्व विशेष बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच प्रत्येक बसवर “विशेष बससेवा” असा दर्शनी फलक लावण्याच्या सूचना दिल्या. चालक आणि वाहकांच्या आरोग्य तपासणीची बसस्थानक परिसरात विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
परतीच्या प्रवासावेळी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने बसेसमध्ये प्रवेश देण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सरनाईक यांनी सांगितले की, ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध केली जाईल. या विशेष बस सेवेमध्ये शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. इच्छुक भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यात्राकाळात रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाची आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै २०२६ रोजी असून, दिवसेंदिवस वाढणारी वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी श्री विठ्ठल साखर कारखाना, देगाव येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या भीमा बसस्थानकाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी आणि एसटीची सेवा अधिक सक्षमपणे पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


