दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडे सांगवी गावासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साडे सांगवी येथील रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी ₹२ कोटी ९० लाख ५८ हजार खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ग्रामविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, गावाच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीनंतर साडे सांगवी गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे रस्ता व पुलाचे मोठे नुकसान झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते. आता त्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता झाली आहे.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, या कामामुळे साडे सांगवीसह परिसरातील नागरिकांना वर्षभर सुरक्षित आणि अखंड वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणारे संपर्काचे प्रश्न दूर होऊन शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांची दळणवळण व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ होईल.
या कामासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवून प्रतिमा-१ ते भोगलगाव साडे सांगवी ते इजिमा-११ ग्राममार्ग क्रमांक ८० वरील पुलाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात नमूद केले होते की, सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे या मार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गावाला भेट देऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सुमारे ₹२.९० कोटींचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.
याबाबत प्रतिक्रिया देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “साडे सांगवीच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे. जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणे हीच आमची कार्यपद्धती आहे. या कामामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.”
या निर्णयासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


