आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!
RTO अधिकारी,दलाल, पोलिस आणि संशयितांच्या आरोप-प्रत्यारोपांनी धाराशिवमधील वाहन हस्तांतरण प्रकरण आणखी गूढ; उच्चस्तरीय SIT चौकशीची मागणी जोरात!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात गाजत असलेल्या बहुचर्चित चारचाकी वाहन हस्तांतरण, बनावट कागदपत्रे, संशयास्पद आरटीओ नोंदणी, डुप्लिकेट आरसी बुक आणि दलालांच्या साखळीशी संबंधित प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात केवळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारीच नव्हे, तर पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
लोकविचारने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत विविध भागांमधून आरटीओ विभागातील कथित गैरप्रकार, दलालांचे जाळे, बनावट आधारकार्ड, संशयास्पद “Before Me” प्रक्रिया, OTP पडताळणीतील त्रुटी, पोस्टातून आरसी बुक गायब होणे आणि परंडा कॅम्पमधील व्यवहारांची पोलखोल केली. मात्र आता हे प्रकरण एका नव्या टप्प्यावर पोहोचले असून, संशयितांपैकी एकाने थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, विशेष पोलीस महा संचालक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणातील संशयित म्हणून नाव आलेले चंदन बळीराम यादव यांनी दिलेल्या निवेदनामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवर नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “मी फक्त मध्यस्थी केली होती. वाहन व्यवहारातील कागदपत्रे, आरटीओ प्रक्रिया, बँक व्यवहार किंवा वाहन हस्तांतरणाशी माझा थेट संबंध नाही. तरीही मला जबरदस्तीने गुन्ह्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा त्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.चंदन यादव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची आणि तक्रारदार नबी मोहम्मद इसाक शेख यांची मागील दहा वर्षांपासून मैत्री आहे. नबी शेख यांनी स्वतः वाहन विक्रीबाबत मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार राजेश शेंडगे यांनी वाहनाच्या व्यवहारासाठी काही रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवली आणि ती रक्कम त्यांनी नबी शेख यांच्या खात्यात जमा केली. “चार लाख ११ हजार ७९४ रुपये मी ऑनलाईन आणि चेकद्वारे नबी शेख यांना दिले आहेत. यापलीकडे माझा कोणत्याही व्यवहाराशी संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याहून गंभीर आरोप म्हणजे आनंदनगर पोलीस स्टेशनमधील तपास प्रक्रियेबाबत करण्यात आलेले दावे. चंदन यादव यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस कर्मचारी बालाजी मुंढे यांनी त्यांना जबाबासाठी बोलावले होते. ते पुण्याहून धाराशिव येथे हजर झाले असताना, दिवसभर न्यायालय परिसरात थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर “वेळ नाही” असे सांगत जबाब लिहून आणण्यास सांगण्यात आले. नंतर त्यांनी तयार केलेला जबाब व्हॉट्सअॅपद्वारे पाठविला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.मात्र, पुढे ५ मे २०२६ रोजी आनंदनगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ अधिकारी खांडेकर यांच्या समोर हजर झाल्यानंतर, “माझ्या इच्छेविरुद्ध जबाब लिहून घेण्यात आला. काही मजकूर बदलण्याची विनंती केल्यानंतरच सही घेतली गेली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या सर्वात सर्वाधिक खळबळ उडवणारा आरोप म्हणजे कथित पैशांच्या मागणीचा. चंदन यादव यांच्या तक्रारीनुसार, आनंदनगर पोलीस स्टेशनच्या आवारात विशाल चांदणे नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून “बालाजी मुंढे यांनी ४५ हजार रुपये देण्यास सांगितले आहेत,” असा निरोप दिला. या घटनेमुळे “मला गुन्ह्यात अडकवण्याचा कट सुरू आहे का?” असा संशय निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.विशेष म्हणजे, चंदन यादव यांनी ही तक्रार केवळ स्थानिक अधिकाऱ्यांकडेच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, गृहराज्यमंत्री योगेश कदम, राज्याचे पोलिस महा निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडेही लेखी स्वरूपात पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचे स्वरूप केवळ वाहन फसवणूक किंवा आरटीओ गैरव्यवहारापुरते मर्यादित राहिले नसून, “अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खालच्या स्तरावर काही निर्दोष व्यक्तींना गुन्ह्यात अडकवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान, स्थानिक पातळीवरही चर्चांना उधाण आले असून, “जर आरटीओतील कथित गैरव्यवहारांची पोलखोल होत असेल, तर त्यामधील मूळ सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचेल का? की प्रकरण केवळ काही नावांपुरते मर्यादित ठेवून दाबले जाईल?” असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात आधीच बनावट आधारकार्ड, पोस्ट ऑफिसमधून आरसी बुक मिळवणे, OTP पडताळणीतील संशय, परंडा कॅम्पमधील “Before Me” प्रक्रिया आणि वाहन हस्तांतरणातील कथित नियमबाह्य हालचाली यांसारखे गंभीर मुद्दे समोर आलेले आहेत. आता पोलिसांवरच पैशांच्या मागणीचे आरोप झाल्याने या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे.
राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकरणात थेट हस्तक्षेप करून स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमावे, आरटीओ विभाग, संबंधित दलाल, बँक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, पोस्ट वितरण नोंदी आणि पोलिस तपास प्रक्रियेचीही चौकशी करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील हे प्रकरण आता केवळ एका वाहनापुरते मर्यादित राहिले नसून, “प्रशासनातील पारदर्शकता विरुद्ध संगनमत” असा मोठा प्रश्न बनला आहे. आगामी काळात वरिष्ठ पातळीवरील चौकशी होते का, पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट होते का, तसेच पैशांच्या मागणीच्या आरोपांची सत्यता समोर येते का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(पुढील भागात : आरटीओ कॅम्पमधील CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि “Before Me” दिवशी प्रत्यक्ष उपस्थित कोण? तपासात समोर येणाऱ्या नव्या धक्कादायक माहितीचा खुलासा.)
लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद | 8390088786



