आरटीओच्या दारात ‘आधार’च बनावट? पोस्टमनपासून कॅम्पपर्यंत संपूर्ण साखळी संशयाच्या भोवऱ्यात!
धाराशिवचा विक्रेता, पुण्याचा खरेदीदार… मग ‘Before Me’ साठी परंडाच का? OTP कोणाला गेला, RC Book कुणी घेतलं? आता तपासाची चक्रं अधिकारी-कर्मचारी आणि दलालांवर!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात गाजत असलेल्या चारचाकी वाहन हस्तांतरण, बनावट कागदपत्रे आणि संशयास्पद आरटीओ नोंदणी प्रकरणात आता आणखी धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. बनावट आधारकार्ड, पोस्ट ऑफिसमधून कागदपत्रांवर परस्पर ताबा, वाहन मालकाच्या अनुपस्थितीत “Before Me” प्रक्रिया आणि OTP पडताळणीतील गंभीर संशयास्पद हालचालींमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
लोकविचारने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या तीन भागांनंतर आता भाग-४ मध्ये या संपूर्ण व्यवहारातील तांत्रिक, प्रशासकीय आणि मानवी साखळीतील गंभीर त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा प्रकार केवळ वाहन हस्तांतरणापुरता मर्यादित नसून “संगनमताने उभे केलेले रॅकेट” असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, वाहन विक्रेता धाराशिवचा, कथित खरेदीदार पुणे येथील आणि व्यवहाराची नोंदणी मात्र परंडा आरटीओ कॅम्पमध्ये करण्यात आली. जिल्हा मुख्यालयात अधिकृत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अस्तित्वात असताना, एवढा संवेदनशील व्यवहार तालुका स्तरावरील कॅम्पमध्ये नेमका कशासाठी नेण्यात आला? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकही विचारू लागले आहेत.
विशेष म्हणजे वाहन हस्तांतरण प्रक्रियेत “Before Me” ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. वाहन विक्रेता आणि खरेदीदार हे प्रत्यक्ष अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहून कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करतात, ओळख पडताळणी केली जाते आणि व्यवहार वैध असल्याची खात्री केली जाते. मात्र या प्रकरणात विक्रेता धाराशिवचा आणि खरेदीदार पुण्याचा असताना, दोघे प्रत्यक्ष परंडा कॅम्पमध्ये उपस्थित होते का? की दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली? असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, आरटीओ प्रक्रियेदरम्यान आधार पडताळणी “My Aadhar” प्रणालीद्वारे केली जाते. संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ओळख आणि बायोमेट्रिक पडताळणी तपासली जाणे अपेक्षित असते. मग या व्यवहारात नेमके कोणते आधार कार्ड तपासण्यात आले? मूळ वाहन मालकाचे की बनावट व्यक्तीचे? संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पडताळणी प्रक्रियेत कोणती खबरदारी घेतली? की सर्व काही “मॅनेज” करून व्यवहार मंजूर करण्यात आला? असे सवाल उपस्थित होत आहेत.
तक्रारदाराचा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे वाहनाच्या कर्जावरील Hypothecation (HP) काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान येणारा OTP नेमका कोणाच्या मोबाईलवर गेला? वाहन मालकाला अधिकृत संदेश प्राप्त झाला होता का? की संबंधित कर्मचाऱ्यांनी किंवा एजंटांनी कार्यालयातच प्रक्रिया पूर्ण करून OTP स्वतःच हाताळला? कारण अशा प्रक्रियेत वाहन मालकाची थेट संमती अत्यावश्यक असते. जर OTP मालकाच्या मोबाईलवर गेला नसेल, तर संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
याचबरोबर, डुप्लिकेट RC Book काढण्याच्या प्रक्रियेतही संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे. पोस्टाद्वारे येणारे आरसी बुक नेमके कुणी स्वीकारले? पोस्टमनला “मॅनेज” करून कागदपत्रे बाहेरच घेतली गेली का? कारण तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्त्यावर कोणतीही अधिकृत कागदपत्रे पोहोचली नाहीत. तरीही RC Book आरोपींच्या ताब्यात कसे गेले? पोस्ट विभागातील कोणाची भूमिका संशयास्पद आहे का? याचाही तपास होणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे.धाराशिवमधील अनेक वाहनधारकांमध्ये आता एकच चर्चा सुरू आहे — “जर मूळ मालकाच्या अनुपस्थितीत, त्याला माहितीसुद्धा न देता वाहन दुसऱ्याच्या नावावर होऊ शकत असेल, तर सामान्य नागरिक सुरक्षित तरी कसे?”विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवहारात दलालांची भूमिका अधिक संशयास्पद मानली जात आहे.
आरटीओ कार्यालयातील काही एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय अशा प्रकारची बहुपदरी प्रक्रिया शक्यच नाही, असा आरोप तक्रारदार आणि नागरिकांकडून केला जात आहे. कारण पत्ता बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, डुप्लिकेट RC Book, HP Removal, वाहन हस्तांतरण आणि “Before Me” प्रक्रिया — या सर्व गोष्टी एकाच साखळीत घडल्याचा दावा करण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणात आनंदनगर पोलीस स्टेशनकडून तपास सुरू असून, संबंधित अधिकारी, कर्मचारी, दलाल आणि संशयित व्यक्तींची भूमिका तपासली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, मोबाईल OTP नोंदी, आधार पडताळणी माहिती, पोस्ट वितरण तपशील आणि कॅम्पमधील उपस्थिती नोंदी तपासल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकरणात थेट हस्तक्षेप करून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव, परंडा कॅम्प, संबंधित एजंट, कर्मचाऱ्यांची मालमत्ता, व्यवहार नोंदी आणि वाहन हस्तांतरण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून होत आहे.कारण हा प्रश्न केवळ एका वाहनाचा नाही; तर परिवहन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकणार की दलालांच्या जाळ्यात अडकणार, याचाही आहे.
(पुढील भागात : परंडा कॅम्पमधील “Before Me” दिवशी नेमके कोण उपस्थित होते? CCTV, सही आणि बायोमेट्रिक तपासातून कोणते धक्कादायक पुरावे समोर येणार?)
लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद | 8390088786


