कोकणच्या धर्तीवर धाराशिवच्या केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – आ. कैलास पाटील
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कोकणातील हापूस आंबा उत्पादकांप्रमाणे आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, गारपीट आणि फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील केशर आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली असून सध्या सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याची बागायती आहे. जिल्ह्यातील हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे येथील केशर आंब्याला विशेष गोडवा आणि चव लाभली असून काही शेतकरी या आंब्याची निर्यातही करतात. मात्र यंदा बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका या बागांना बसला आहे. मोहर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील तीव्र चढ-उतार, गारपीट आणि कीड प्रादुर्भावामुळे उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे चित्र आहे.याच पार्श्वभूमीवर कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना राज्य सरकारने प्रति हेक्टर 22 हजार 500 रुपयांची मदत जाहीर करून वितरित केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही तितकाच फटका बसूनही अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही, याकडे आमदार कैलास पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी कृषी विभागाच्या पथकासह धाराशिव जिल्ह्यातील चार तालुक्यांतील आंबा बागांची पाहणी केली होती. या पाहणीत उत्पादनात किमान 50 टक्के घट झाल्याचा निष्कर्ष समोर आला. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी नुकसान भरपाईचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर केला आहे. मात्र अद्याप निर्णय प्रलंबित आहे.आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करताना कोकणच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर 22 हजार 500 रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, तसेच फळबाग विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना फळपीक विम्याचा लाभ त्वरित द्यावा, अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकांना तातडीने आर्थिक मदत मिळाल्यास संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


