धाराशिव, दि.११ऑगस्ट(प्रतिनिधी):धाराशिव शहरातील वडार समाजासाठी कायमस्वरुपी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून, तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेविरोधात आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.
शहरातील कपिलधारा भागात विविध समाजासाठी शासनाने स्वतंत्र स्मशानभूमीची सोय करून शेड, निवारा, रस्ते व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता करून दिली आहे. मात्र, वडार समाजासाठी कोणतीही कायमस्वरुपी स्मशानभूमी उपलब्ध नाही. सध्या वडार समाजातील अंत्यसंस्कार एका खुल्या जागेत होतात, जी खासगी मालकीची असल्याचे समजत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
माती, वडार, गाडी वडार, पाथ्रुड वडार हा सर्व कष्टकरी समाज असून, या समाजाने कपिलधारा परिसरातील इतर समाजांच्या स्मशानभूमीत शेड, निवारा, रस्ते, कंपाऊंडवॉल इत्यादी कामांमध्ये श्रमदानासह मोलाचे योगदान दिले आहे. तरीदेखील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वडार समाज कायमस्वरूपी स्मशानभूमीपासून वंचित राहिला असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख आणि शहर उपाध्यक्ष राजेंद्र कुऱ्हाडे यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर वडार समाजासाठी स्वतंत्र व कायमस्वरुपी स्मशानभूमीची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव यांना सादर करण्यात आले असून, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष पाशाबाई शेख, शहर उपाध्यक्ष राजेंद्र कुऱ्हाडे, शिवानंद ढोरमारे तालुका सचिव, फुलचंद जाधव, महेश इटकर, लक्ष्मण गायकवाड, आझाद शेख, अनिल ईटकर, मारुती धोत्रे, संतोष लष्करे आदींच्या सह्या आहेत.
