नळदुर्ग शहरात तुळजापूरच्या धर्तीवर अतिक्रमण हटाव मोहीम कधी?प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष, रस्ते मोकळे करण्याची मागणी.
नळदुर्ग प्रतिनिधी अझहर शेख
नजीकच्या तुळजापूर शहरात नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांच्या पुढाकाराने नगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करून मुख्य रस्ते मोकळे केले आहेत. या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आता ‘अशीच कारवाई नळदुर्ग शहरात कधी होणार?’ असा सवाल नळदुर्गकर उपस्थित करत आहेत.नळदुर्ग शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक अक्कलकोट रोड परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कच्च्या-पक्क्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी मार्ग उरलेला नाही.तुळजापूर नगरपालिकेने ज्याप्रमाणे राजकीय इच्छाशक्ती दाखवून शहराचे सौंदर्य आणि नागरिकांची सोय यासाठी रस्ते मोकळे केले, तसाच धाडसी निर्णय नळदुर्ग नगरपालिकेने घेणे अपेक्षित आहे. नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर असून पर्यटकांची येथे मोठी वर्दळ असते, मात्र रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या प्रतिमेला तडा जात आहे.नागरिकांच्या अपेक्षारस्ते रुंदीकरण मुख्य रस्त्यांवरील टपऱ्या आणि वाढीव बांधकामे हटवून रस्ते मोकळे करावेत. पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ विक्रेत्यांच्या तावडीतून सोडवावेत. अधिकृत विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून रस्त्यावरील गर्दी कमी करावी.तुळजापूरच्या धडाकेबाज कारवाईनंतर आता नळदुर्ग नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यावर काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “शहराचा विकास आणि शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,” अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


