लोकविचार’च्या पाठपुराव्याला यश बसस्थानकातील दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा….
अकाउंट सेक्शनचे नव्या इमारतीत स्थलांतर अंतिम टप्प्यात विभाग नियंत्रक अजय पाटील
धाराशिव | लोकविचार
शहरातील बसस्थानकाच्या मागील जीर्ण व पडीक इमारतीतून सुरू असलेल्या अकाउंट (कॅशियर) विभागाच्या दयनीय परिस्थितीला अखेर दिलासा मिळणार आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ‘लोकविचार’ने सातत्याने या प्रश्नावर प्रकाश टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून आता संबंधित विभागाचे नव्या, सुसज्ज बसस्थानकाच्या इमारतीत स्थलांतर करण्याचा मार्ग अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
सध्या अकाउंट विभाग ज्या ठिकाणाहून कार्यरत आहे, त्या इमारतीची अवस्था अत्यंत खराब आहे. परिसरात झाडे-झुडपे, गवत, दुर्गंधी यांचा त्रास असून डुकरे, कुत्री, जनावरे तसेच सापांचा वावर असल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात गटाराचे पाणी वाहत असल्याने महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना पाण्यातूनच ये-जा करत तिकीट मशिन व रोख रक्कम जमा करावी लागत होती. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत होती.
दरम्यान, नवीन बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध असतानाही अकाउंट विभाग तिकडे स्थलांतरित करण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता. ‘लोकविचार’ने या मुद्द्यावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने अखेर प्रशासनाला जाग आली.
याच पार्श्वभूमीवर तत्कालीन विभाग नियंत्रकांच्या हलगर्जीपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय सहन करण्याची वेळ आली होती. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी धाराशिव आगारातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ कारवाई केली. कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अकाउंट / क्याशियर सेक्शन स्थलांतरित करण्यासाठी तातडीने निविदा काढून कामाला प्राधान्य दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अकाउंट सेक्शनचे नव्या बसस्थानकाच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सुमारे ९५ ते ९८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाईट फिटिंग व इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन येत्या आठवडाभरात अकाउंट सेक्शनचे पूर्णतः स्थलांतर होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी ‘लोकविचार’शी बोलताना दिली. येत्या १ मे ‘कामगार दिना’पूर्वीच हे स्थलांतर पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून ‘लोकविचार’ने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल तसेच प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल कर्मचारी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. “दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्येला न्याय मिळाला,” अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
एकूणच, पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
लोकविचार – “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक: अमजद सय्यद | 083900 88786



