‘धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे? सत्ताधारी भाजप लोकप्रतिनिधींना माजी नगरसेवक सोमनाथ गुरवांचा थेट सवाल!
धाराशिव लोकविचार
शहराचे ‘उस्मानाबाद’वरून ‘धाराशिव’ असे नामांतर होऊन बराच काळ लोटला असतानाही तेरणा जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अद्याप ‘उस्मानाबाद’ हे जुने नाव कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी नगर परिषद सत्ताधारी भाजप नगरसेवकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
गुरव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहराचे अधिकृत नामांतर झाल्यानंतरही सार्वजनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी जुन्या नावाचा फलक कायम कसा राहतो? सत्ताधाऱ्यांना हा फलक दिसत नाही का, की सत्ताधाऱ्यांना या विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही? असा सवाल त्यांच्या भूमिकेतून उपस्थित झाला आहे.
‘हिंदुत्वाचे पांघरूण घेणाऱ्या पुढाऱ्यांना नामांतराचा विसर पडला का?’ असा थेट टोला गुरव यांनी लगावल्याने आता या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. नामांतराच्या मुद्द्यावर राजकीय श्रेय घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात शहरातील जुन्या नावांचे फलक बदलण्यासाठी काय केले, याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, तेरणा जलशुद्धीकरण केंद्रासारख्या शहराच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणी ‘नगर परिषद धाराशिव’ आणि ‘धाराशिव शहर पाणीपुरवठा योजना’ अशी योग्य नावे लावण्यात यावीत, अशी मागणी गुरव यांनी केली आहे.
“दोन दिवसांत नाव बदलले नाही, तर शिवसेना स्वखर्चाने फलक लावणार,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा केवळ नामफलकाचा विषय न राहता सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षाचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.
शहराचे नामांतर झाल्यानंतरही शासकीय, निमशासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी जुन्या नावांचे अवशेष कायम असतील, तर नामांतराच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि नगर परिषद प्रशासन या गंभीर मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेणार? जुना फलक कधी हटवणार? याकडे आता धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोमनाथ गुरव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी नगरसेवकांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार का आणि प्रशासन तातडीने कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











