तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईला तीव्र विरोध – उमेश राजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष
तुळजापूर | प्रतिनिधी
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगार व उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, हॉटेल, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तामलवाडी टोलनाका परिसरात शांततामय निषेध आंदोलन करण्यात आले. स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणणारी कोणतीही कारवाई प्रशासनाने करू नये, अशी ठाम भूमिका यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
तामलवाडी टोलनाका परिसरात अनेक वर्षांपासून हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉल चालक, दूध विक्रेते, स्नॅक्स सेंटर चालक तसेच इतर छोटे-मोठे व्यावसायिक आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या व्यवसायांवर अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न अवलंबून असून, बहुतांश व्यावसायिक हे शेतकरी कुटुंबांतील आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या जागेजवळच शेती असल्यामुळे व्यवसाय बंद झाल्यास त्यांच्या कुटुंबांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहू शकते, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
टोलनाका परिसरातील हॉटेल व दुकाने हटविण्याची कारवाई होणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक व्यावसायिकांच्या उपजीविकेचा गांभीर्याने विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या जमिनीबाबतही भूमिका स्पष्ट केली. संबंधित ठिकाणी पालकमंत्र्यांनी जमीन खरेदी केली असून त्या जागेवर शेती, फळबाग किंवा रिसॉर्ट उभारणे हा त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो. मात्र, त्यासाठी स्थानिक गोरगरीब व्यावसायिकांच्या रोजगाराचे साधन असलेली दुकाने आणि व्यवसाय अतिक्रमणाच्या नावाखाली हटविणे योग्य ठरणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले. स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम करणारी कोणतीही कारवाई तात्काळ थांबवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
स्थानिक व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. संबंधित व्यावसायिकांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, धिरज पाटील, धनंजय राऊत, शिवाजी गायकवाड, अरविंद बेडगे, अमोल कुतवळ, दिलीप भोकरे, सयाजी देशमुख, राजेंद्र शेंडगे, गौरीशंकर मुळे, नगरसेवक अझहर, गोपाळ सुरवसे, हणमंत गवळी, दादासाहेब चौधरी, सिद्धेश्वर अण्णा कस्तुरे, सुनिल माळी, सत्तार मुलाणी, गोविंद डोंगरे, डॉ. पंकज घुगे, पोपट मोटे, उत्तमदादा पाटील, संजय गुंजूटे, तुकाराम नवगिरे, ज्ञानेश्वर जगताप, सुमन नवगिरे, विकास वडणे, दीपक वडणे, अश्विनकुमार आतकरे, जुबेर शेख, संदीप सुरवसे, पेंदे, सौ. वाघे ताई शिंदे, भीमा रणसुरे, दादाराव नेटके, हरिदास घोटकर, निजाम शेख, तानाजी नेटके, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार आणि उपजीविका अबाधित ठेवूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.











