आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल; मल्हारदादा पाटलांच्या नेतृत्वात भाजपात जाण्याचा निर्णय
कळंब लोकविचार
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कोणतीही साधनसामग्री नसतानाही पक्षासाठी जीवाचे रान करून काम केले. आ. कैलास पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयासाठी शहरात मतदारांपर्यंत पोहोचून प्रामाणिकपणे संघर्ष केला. मात्र नगर परिषद निवडणुकीच्या वेळी ज्यांच्यासाठी एवढा संघर्ष केला, त्याच नेतृत्वाने कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली, असा घणाघाती आरोप करत उबाठा गटाचे नेते संजय मुंदडा यांनी आपल्या भाजप प्रवेशामागील भूमिका स्पष्ट केली.
मुंदडा यांनी सांगितले की, “ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष केला, त्यांनीच वेळ आली तेव्हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे अशा नेतृत्वासोबत पुढे का राहायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला.
”नगर परिषद निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काहींनी उघडपणे प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारच्या भूमिकांवर कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालण्यात आले. त्यामुळे हा केवळ कार्यकर्त्यांचा विश्वासघात नसून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या विश्वासाशी केलेली गद्दारी असल्याचे मुंदडा यांनी म्हटले.
नगर परिषद निवडणुकीनंतर शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने अपेक्षा ठेवूनही कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. आमदार म्हणून नागरिकांच्या तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अपेक्षित ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“आम्ही गप्प राहिलो, कारण आदेश होता”आजपर्यंत आपण जाणीवपूर्वक कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही, असे सांगताना संजय मुंदडा म्हणाले की, “आमदार राणादादांचा निरोप होता की कोणालाही काही बोलू नका. त्यामुळे आम्ही संयम ठेवला आणि गप्प राहिलो. मात्र आता तुम्हीच सुरुवात केली आहे, तर आम्हालाही सत्य बोलावे लागेल.”दरम्यान, युवा नेते मल्हारदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत प्रत्यक्ष मदत केली.
विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात कोण उभे राहते आणि कोण पाठ फिरवते, यातील फरक स्पष्ट झाल्याचे मुंदडा यांनी नमूद केले. शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणारविश्वासघाताच्या राजकारणाला विकास आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या राजकारणातून उत्तर देण्याचा निर्धार संजय मुंदडा यांनी व्यक्त केला. “आता निर्णय झाला आहे.
युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या नेतृत्वात उबाठाचे शहरातील शेकडो कार्यकर्ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत,” अशी घोषणा त्यांनी केली.संजय मुंदडा यांनी घेतलेली भूमिका ही केवळ पक्षबदलाची नसून, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा आवाज असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाला साथ देण्याचा निर्णय मुंदडा यांनी घेतला असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












