लोकविचार इम्पॅक्ट : २४ तासांत रस्त्यावर उतरली वाहतूक यंत्रणा; मात्र अजूनही अनेक ठिकाणी सुधारणा आवश्यक
धाराशिव | लोकविचार
“धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ; एसपी मॅडम सांगा, हे फेल्युअर कोणाचे?” या मथळ्याखाली लोकविचारमध्ये दि. २१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे चित्र अवघ्या २४ तासांत पाहायला मिळाले. कालपर्यंत वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेत असलेले अनेक चौक आज वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गाठल्याचे दिसून आले.
जिल्हा न्यायालय ते समर्थ नगर मार्गावर काल अत्यंत विस्कळीत वाहतुकीचे चित्र समोर आले होते. आज मात्र या मार्गावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत वाहतूक नियंत्रणात आणल्याचे दिसून आले.
त्याचप्रमाणे लहुजी वस्ताद शाळा चौक, भोसले हायस्कूल परिसर तसेच बार्शी नाका येथेही वाहतूक शाखेचे कर्मचारी कार्यरत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सकारात्मक चित्र नागरिकांना पाहायला मिळाले.
मात्र दुसरीकडे काही ठिकाणी परिस्थिती अद्यापही समाधानकारक नसल्याचे दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानकासमोर नियुक्त असलेले दोन कर्मचारी निवांत दिसून आले, तर त्याच परिसरात हॉटेल प्रदीप समोर तसेच बस स्थानक मुख्य गेट समोर रिक्षा, फळ विक्रेते आणि इतर अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र होते. प्रत्यक्ष समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी केवळ उपस्थिती दाखविण्यावर भर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
देशपांडे स्टॅन्ड भाजी मंडई परिसरात तर एक कर्मचारी झाडाखाली बसून वेळ घालवत असल्याचे दिसून आले. तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (सेंटर बिल्डिंग) चौकात कर्मचारी नसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचेही निदर्शनास आले.
विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी शहरात फेरफटका मारताना दिसले. मात्र सर्व कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे कामाला लावण्याऐवजी काही मोजक्या “लाडक्या” कर्मचाऱ्यांसह फिरण्यातच अधिक वेळ घालवला जात असल्याची चर्चा वाहतूक शाखेत सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही कर्मचाऱ्यांना कोणत्याही निश्चित चौकात ड्युटी न देता अधिकाऱ्यांसोबत ठेवले जात असल्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
लोकविचारने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर प्रशासनाची यंत्रणा रस्त्यावर उतरली, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र केवळ एक-दोन दिवसांची दिखाऊ कारवाई न होता शहरातील वाहतूक व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा होणे अधिक महत्त्वाचे आहे. वाहतूक कोंडीच्या मूळ कारणांवर उपाययोजना, अवैध पार्किंगवर नियंत्रण, अतिक्रमण हटविणे आणि प्रत्येक वर्दळीच्या चौकात नियमित कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना समान जबाबदारी देण्याचे तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला विशेष सवलत न देता प्रत्यक्ष रस्त्यावर काम करण्याचे निर्देश देण्याची गरज व्यक्त होत आहे.
लोकविचारच्या वृत्तानंतर यंत्रणा जागी झाली, ही चांगली बाब असली तरी धाराशिवकरांना अपेक्षा आहे ती तात्पुरत्या हालचालींची नव्हे, तर कायमस्वरूपी आणि परिणामकारक वाहतूक व्यवस्थेची.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











