गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे पोलीस संरक्षण देण्याची मागणी
धाराशिव लोकविचार
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील सुरेश बाबुराव भिसे व त्यांच्या गुंडाकडून मला व माझ्या कुटुंबियांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भिसे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी. ते धारदार शस्त्र घेऊन गुंडासह फिरत धमकी देत असल्यामुळे मला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे काक्रंबा मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य दयानंद मनोहर शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२४ ऑगस्ट रोजी केली.
दरम्यान, भिसे यांच्या गुंडगिरीचे अनेक पुरावे असून ते लवकरच पोलीस प्रशासनाकडे सादर करणार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझ्या काक्रंबा जिल्हा परिषद मतदार संघात मला तू निवडणूक लढवू नको अशी धमकी देखील भिसे यांनी दिली होती. मात्र, मी त्याच मतदारसंघात निवडणूक लढवली व विजयी झालो हा विजय त्यांना अजून पचला नसून त्यावरून ते सातत्याने माझ्याशी कटकारस्थान करून भांडणे करीत आहेत. दि.२१ ऑगस्ट रोजी भिशे यांनी मला फोनवर अर्वाचे भाषेत शिवीगाळ करीत बंदुकीची गोळी …मध्ये घालीन अशी धमकी दिली.
त्यानंतर ते दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान शिंदे हे रहात असलेल्या मसला (खुर्द) येथे भिसे फोरच्युनर गाडीमध्ये त्यांच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना शिंदे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने आले असल्याचा आरोप त्यांनी केला. भिसे व त्यांच्या कार्यकर्त्याकडे तलवार व इतर शस्त्र असल्यामुळे त्यांची संपूर्ण परिसरात प्रचंड मोठी गुंडगिरी व दहशत निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे ते प्रत्येकाला धमकावून आपली दडपशाही निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भिसे यांचे परिसरामध्ये तोडपाणी करण्याचे व धमकावण्याचे तसेच इतर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणीच कारवाई करण्यास धजावत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करून दहशत काक्रंबा व परिसरातील भागामध्ये भिसे आणि त्यांच्या गुंड टोळीचे अनेक काळे कारनामे समोर येत आहेत. सवर्ण समाजातील व्यक्तीवर विनाकारण दबाव टाकून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत त्यांच्याबरोबर तोडपाणी करून ते गुन्हे माघारी घेऊन त्यांना बदनाम करण्याचे काम भिसे व त्यांच्या टोळीच्या माध्यमातून सातत्याने केले गेले व करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
भिसे व त्यांच्या टोळीकडे काळ्या मार्गाने मिळवलेला पैसा व अवैध धंदे तसेच त्यांच्याकडे विना परवाना धारदार शस्त्र वापरून ते दहशत निर्माण करीत असल्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











